आझाद मैदानाला लागून असलेल्या मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयावर काल रात्री काही अज्ञात इसमांनी हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे राजकिय क्षेत्रात मोठ्या खळबळ माजली. मात्र कालांतराने मुंबईतील उत्तर भारतीय फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाला प्रतित्तुर देण्यासाठी कॉंग्रेस मुबंईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यास प्रतित्तुर म्हणून मनसैनिकांनी मुंबई कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला करत परतफेड करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. मनसेची संस्कृती गुंडगिरीची आहे. लोकशाहीत कायदे व नियमांचे पालन करीत परस्परांच्या मतांचा आदर केला पाहिजे, परंतु मनसेचे कार्यकर्ते ज्या पध्दतीने कायदा हातात घेऊन मुंबईत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत ते निषेधार्ह आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी तोडफोड करून अनेक लोकांना मारहाण केली. काँग्रेस पक्षाने मनसेच्या या दादागिरीचा विरोध केला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी त्याच्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पाठीशी घातल्याने त्यांचे मनोबल वाढले असून राजकीय विरोधकांच्या कार्यालयावर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरुपाचा होता. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.