मुंबई : प्रतिनिधी
देशातील आणि राज्यातील भाजपच्या सरकारकडून सबका साथ सबका विकास यानुसार सर्वांना सोबत घेवून विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे यांच्या राजकिय पक्षाची दुकानदारी बंद होण्याची पाळी आल्याने विरोधकांकडून संविधान बचाव रँली सारख्या रँली काढत असून संविधानाच्या आडून सत्तेचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या रँलीला प्रतित्तुर देण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून काढण्यात आलेल्या संविधानच्या सन्मानसाठी तिरंगा मार्च या रँलीच्या समारोपाप्रसंगी केली.
चैत्यभूमीपासून तिरंगा मार्च या रँलीला सुरुवात होवून त्याची सांगता परेल येथील कामगार मैदानावर झाली. या मार्चमध्ये भाजपचे मुंबईतील जवळपास सर्वच आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रँलीसाठी मुख्यमंत्री बुलेट या दुचाकीवरून रँलीत सहभागी झाले.
ज्या संविधान धोक्यात आल्याची ओरड विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र संविधान ही आमची माता आहे. तीला बदलण्याचा कोणताही भाजपचा हेतू नसल्याची ग्वाही देत दलित-वंचितांचा फार कळवळा असल्याचे विरोधक सांगतात. मात्र यांच्याच काळात दलित-आदीवासींवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
विरोधकांची भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची लायकी नसल्याची टीका करत ते म्हणाले की, १५ वर्षे डॉ. आंबेडकरांच्या स्माराकासाठी जमिन देण्याची मागणी होत होती. परंतु या सरकारने इंदू मिलची जागा स्मारकासाठी दिली नाही. तर दुसऱ्याबाजूला कमला मिलची जागा मात्र त्या मालकाच्या घशात घालत गिरणी कामगारांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे चित्र आणि भवितव्य बदलण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असल्याने या सर्वांवर बेकारी होण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे विरोधकांना भ्रष्टाचार, दंगलींवर भाष्य करण्यास जागा मिळत नसल्याने राज्यघटना बदलण्याची हाळी उठवून स्वत:च्या सत्तेचा मार्ग तयार करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
आणि मुख्यमंत्र्यांचा आवाज बसला
विरोधकांच्या रँलीला उत्तर देण्यासाठी म्हणून काढण्यात आलेल्या तिरंगा मार्चला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी जोषात भाषणाला सुरुवता केली. मात्र भाषणाला काही मिनिटांचा अवधी लोटत नाही. तोच त्यांच्या आवाजाने त्यांना साथ देण्यास नकार देण्यास सुरुवात केली. त्यामुळे विरोधकांच्या प्रतित्तुर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आवाजच राहीला नाही अशी मिश्किल टीप्पणी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली. तरीही दोन वेळा पाणी पिऊन मुख्यमंत्र्यांनी घसा साफ करून भाषण तसेच बसलेल्या आवाजात भाषण पूर्ण केले.