मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार चिंचवडची जागा शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही आग्रही होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली. मात्र आता भाजपाचे आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकिट दिल्याने जगताप यांच्या बाजूने सहाभूतीचे लाट चांगलीच निर्माण झाली आहे. तर भाजपाने काटे यांच्या मागून अजित पवारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यामुळे आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची सीट धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची आज रँली काढण्यात आली. त्यामुळे चिंचवड जागेचा एकतर्फी होणारा सामना भाजपा- आघाडीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी रँलीनंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, माणूसकी आणि विश्वास यांच्या पाठीत खंजीर खूपसून चाळीस गद्दारांनी भाजपाला हाताशी धरून शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, शिवसेना कधीच संपणार नसून, ती अधिक ताकदीने उभी राहील. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गद्दारांना आणि भाजपाला धडा शिकविण्याची संधी चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. बेईमान आणि गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचे रान करून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना विजयी करावे, असे आवाहन केले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. थेरगाव येथील गणेश मंदिरापासून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेससह सर्व मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिकांनी रॅलीसाठी मोठी गर्दी केली होती.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे राज्यात सत्तांतर घडले. शिवसेना संपवण्याची खेळी याच व्यक्तीला हाताशी धरून भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. त्याचा बदला घेण्याची संधी चिंचवडच्या निवडणुकीमुळे प्राप्त झाली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सच्चा शिवसैनिकांनी नाना काटे यांच्या विजयासाठी जिवाचे रान करावे असे आवाहन केले.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, जुलमी हुकूमशहाच्या बळावर अख्ख्या पक्षाचे अपहरण करण्याचा डाव आखण्यात आला. परंतू, जनतेच्या मनातील प्रेम आणि निष्ठा याची चोरी कशी करणार? अलीबाबा आणि त्याच्या ४० चोरांना धडा शिकवण्याची संधी या निवडणुकीच्या रुपाने चिंचवडकरांना मिळाली आहे. त्यांची लढाई सत्तेसाठी आहे, तर आपली लढाई ही सत्य आणि लोकशाहीसाठी असल्याचेही स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विकासाचे श्रेय लाटण्यात आणि इतरांच्या विकासकामांवर मते मागताना सध्या विरोधी उमेदवार दिसत आहेत. त्यांनी अथवा त्यांच्या पक्षाने केलेली महत्त्वाची दोन कामे जाहीर करावीत, असे थेट आव्हानच अजित पवार यांनी आजच्या रॅली दरम्यान दिले. उपस्थितांना संबोधित करताना पवार म्हणाले, उद्योगनगरी, आयटीनगरी कोणी उभी केली, विकासकामे कोणी केली हे येथील जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. मात्र ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या प्रवृत्तीच्या भाजपा नेत्यांनी आम्ही केलेला विकास त्यांचा असल्याचा खोटा प्रचार चालविला आहे. त्यांच्या काळात चिंचवड मतदारसंघासाठी केलेली दोन महत्त्वाची कामे जाहीर करावीत, असे आव्हानच पवारांनी दिले.