पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पात कंत्राटदारांना पोसण्याचं काम या सरकारने केलं आहे. जनतेच्या हाती केवळ भोपळा देण्याचं काम सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर विविध विषयांवर जोरदार हल्ला चढविला.
अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे बोलत होते.
अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने आणलेला सहकार विधेयक हे एकाधिकारशाही निर्माण करणारे असल्याने ते चिकित्सक समितीकडे पाठविण्याची मागणी करत ते परिषद सभागृहात थांबवण्यात आलं, हे आमच यश ठरल. या अधिवेशनात कायदा व सुव्यवस्था, शेतकरी आदी विषय पोटतिडकीने मांडले मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात दारोदारी गोळीबार होत असताना आता लोकशाहीच पवित्र मंदिर असलेल्या विधानभवनातही सत्ताधारी मंत्री व त्यांचे आमदार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले. यामुळे लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अपमान झाल्याची खंत व्यक्त करत सत्ताधाऱ्यांच्या या वागणुकीवर टीका केली.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, हिंगोली, ठाणे, पालघर, लातूर, अहमदनगर, सोलापूर या सहा जिल्ह्यात पंतप्रधान खरीप हंगाम अंतर्गत केंद्राच्या लवादाने विमा रद्द केलं आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक रुपयाही मिळाला नाही. हमीभाव न देता शेतमाल कोणी खरेदी करत असेल तर गुन्हे दाखल केले जातील ही शासनाच्या घोषणेचा त्यांना विसर पडला असल्याची टीका केली.
शेवटी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, कापूस, सोयाबीन आदी पिकांना हमीभाव मिळत नसल्यामुळे, तसेच विविध विभागातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना मानधन वाढीच दिलेल्या वचनाचीही सरकारने पूर्तता न केल्यामुळे आज त्यांना आंदोलन कराव लागत असल्याचे सांगत राज्याच्या विकासाच हित न साधता सत्ताधाऱ्यांनी राजकारण आणि राजकारण करण्यासाठी या अधिवेशनाचा वापर केल्याचा आरोप केला.