आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सरकारने स्थगिती दिलेली कामे पुन्हा सुरू करा, याप्रश्नी चर्चा करा अशी मागणही त्यांनी यावेळी केली.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी औचित्याचा मुद्दाद्वारे अजित पवार म्हणाले, आम्ही अनेकांची सरकारे पाह्यली. मनोहर जोशी यांचे सरकार ते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तोपर्यंतची सरकारे पाह्यली. मात्र असे कधी झाले नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या विकास कामांना निधी मंजूर करण्यात आला, वर्क ऑर्डर देण्यात आली. त्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती कशासाठी दिली असा सवाल केला.
तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, आता प्रश्नोत्तराचा तास आहे. तो आपण घेऊ या. तुम्ही जो मुद्दा मांडला. त्या मुद्याची दखल फडणवीसांनी घेतली आहे. मात्र आता आपण प्रश्नोत्तराचा तास घेऊ या असे सांगत पहिला प्रश्न पुकारला.
अध्यक्ष नार्वेकर यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधी बाकावरील सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत, नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, खोके सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
या गोंधळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले, अजित दादा आम्हाला मान्य आहे की, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त वेळा निवडूण आलात. तुमच्यापेक्षा आम्ही कमी वेळा निवडूण आलोय. परंतु जे काही आम्ही शिकलोय ते तुमच्याकडूनच शिकलोय. राज्यात उध्दव ठाकरे यांचे सरकार असताना विरोधकांचा निधी रोखण्याचे काम आपण केले. इतकेच काय माझ्या मतदार संघातील कामाचा निधी आपण रोखलात. पण तुम्ही अन्याय केलात म्हणून आम्ही करणार नाही.
स्थगिती दिलेल्या कामांपैकी ७० टक्के कामे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. फक्त आता ३० टक्के कामांसाठी निधीची तरतूद करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले.
तुम्ही ज्या कामांना २००० कोटी रूपयांचा निधी दिला होतात. त्या कामांना आम्ही ४ गहजार कोटी, ६ हजार कोटी रूपयांचा निधी दिल्याचे फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
त्यानंतरही प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यानही विरोधकांचा गोंधळ सुरु राहिल्याने अखेर विधानसभेचे कामकाज काही वेळांसाठी चार ते पाच वेळा तहकूब करण्यात आले.