एकाबाजूला केंद्र आण राज्य सरकारकडून २८ कोटीपैकी २२ कोटी नागरिकांना विविध गरिबीरेखेच्या बाहेर काढले. तसेच विविध माध्यमातून रोजगाराच्या आणि मोफत अन्नधान्य पुरवित त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने करण्यात येत आहे. परंतु मुंबईतील एका कष्टकरी रहिवाशाला आपल्या वडापावच्या गाडीवर कारवाई करत त्याची मोडतोड केल्याने त्याची दाद मागण्यासाठी सदर रहिवाशाने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षेच्या कारणास्तव लावलेल्या जाळीवर उडी मारत आंदोलन केले. सदर कष्टकरी मुंबईकराचे नाव ॲडविन बंगेरा असे असून तो बोरीवलीचा रहिवासी आहे.
साधारणतः मुंबई महापालिकेने एका वर्षापूर्वी त्यांच्या वडापावच्या गाडीवर कारवाई करून ती ताब्यात घेतली. तेव्हापासून ही गाडी सोडवण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले; पण दाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी हा मार्ग स्वीकारला. मंत्रालयात तैनात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याच्या हवाली केले. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
यापूर्वीही अनेकदा मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र राज्य सरकारकडून मंत्रालय हे पिडीत अथवा अन्यायग्रस्त व्यक्तीच्या आत्महत्यांचे केंद्र बनू नये यासाठी लावलेल्या जाळीवर उडी मारता येऊ नये म्हणून सर्व मजल्यांवर संरक्षक तारा बसवण्यात आल्या आहेत. पण तरीही हा प्रकार घडल्याने ही उपाययोजना अपुरे असल्याचे समोर आले.