भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा गेल्या पाच तासांपासून आमदार रविंद्र वायकर यांची चौकशी करीत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवरही अनधिकृत ताबा घेऊन ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. याप्रकरणी पाच तास चौकशी झाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, तो लिंगपिसाट माणूस आहे. माझी चौकशी सुरु असतानाही तो व्यक्ती खाली आला आणि खालून अधिकाऱ्यांना फोनवरून सांगत होता. पण मी चौकशीला सामोरे गेलो. परत बोलावलो तर परत येईन असे सांगत भाजपाचे किरीट सोमय्या आणि ईडीला आव्हान दिले.
आर्थिक गुन्हे शाखेकडे येणाऱ्या तक्रारीप्रकरणी सर्वात आधी प्राथमिक चौकशी केली जाते. तक्रारीमधील आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच आरोपांमध्ये तथ्य न आढळल्यास याप्रकरणाची प्राथमिक चौकशी बंद केली जाते. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांकडे सोमय्या यांनी तक्रार केली होती. पण ती तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार रविंद्र वायकर यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. तसेच त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली.
रविंद्र वायकर यांनी ट्रस्टच्या नावाने गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेले खुले क्रीडांगण व उद्यानासाठी असलेल्या जागेवर रविंद्र वायकर यांनी अनधिकृत ताबा घेतला आहे. तिथे दोन लाख चौरस फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्यास सुरुवात केली आहे. जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे. या हॉटेलची किंमत ५०० कोटी रुपये इतकी होत असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता. त्यावर बोलताना रविंद्र वायकर म्हणाले, आम्ही जे काही बांधकाम केले. तो कायदेशीर केले आहे. मला एकट्याला तशी जागा दिली नाही. तर इतर क्लबलाही अशाच पध्दतीने जमिन दिली. त्यामुळे मी काही गैर केले नाही असे स्पष्ट केले.
रवींद्र वायकर यांनी ही जागा एका कंपनीकडून ताब्यात घेतली होती. बागेचे आरक्षण दाखवून चार कोटी रुपये रेडी रेकनर मूल्याचा भूखंड तीन लाख रुपयांना खरेदी केला. त्यानंतर या भूखंडावरील ३३ टक्के जागेवर वायकर यांनी बँक्वेट बांधले. गेली अनेक वर्षे या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार सुरू आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. या आरोपाबाबत बोलताना रविंद्र वायकर म्हणाले की, त्यांच्या निरमा वॉशिंग पॉवडर गटात येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून या गोष्टी केल्या जात आहेत. सत्याच्या बाजूनं उभ्या राहिल्यानंतर अशा घटना घडणारचं आहेत. त्यामुळे अशा चौकशांना मी घाबरत नाही. त्यांनी चौकशीला परत बोलावलं तर मी परत यायला तयार आहे. पण त्यांनी पुढील चौकशीसाठी बोलावलं नाही. मी चौकशीत स्पष्टपणे सांगितलं आहे की, तो माणूस जाणिवपूर्वक लोकप्रतिनिधींच्या विरोधात अशा गोष्टी करत असतो. सदरचा व्यक्ती त्यांच्या पक्षात जाणार असेल तर तो गप्प बसतो असेही रविंद्र वायकर यांनी स्पष्ट केले.