कोरोना काळात मुंबई महापालिकेने स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्यासाठी राबविलेल्या योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून खा. संजय राऊत यांची कन्या, भाऊ तसेच निकटवर्तीयांना या भ्रष्टाचारात लाखो रुपयांचा लाभ झाला आहे , असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खा. डॉ . किरीट सोमैया यांनी शुक्रवारी केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यावेळी उपस्थित होते.
डॉ किरीट सोमैया यांनी सांगितले की, कोरोना लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत कामगारांना जेवण म्हणून मुंबई महापालिकेतर्फे खिचडी वाटप करण्यात आले. खा. संजय राऊत व सुजित पाटकर यांचे भागीदार राजीव साळुंखे यांच्या सह्याद्री रिफ्रेशमेंट या बोगस कंपनीला मुंबई महानगरपालिकेने खिचडीचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट दिले. त्यात ६ कोटी ३७ लाख रुपयाचा घोटाळा झाला असल्याबाबत प्राथमिक माहिती अहवाल (एफ.आय.आर) ही दाखल झाला आहे.
सह्याद्री रिफ्रेशमेंट यांचे वैश्य सहकारी बँक, परळ (पूर्व), येथे खाते आहे. त्यात खिचडी व्यवहाराचे लाखो रुपये जमा झाले. या खात्यातून खा. संजय राऊत यांची कन्या विधिता संजय राऊत, खा. राऊत यांचे भाऊ संदिप (आप्पा) राजाराम राऊत व राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांच्या खात्यात लाखो रुपये ट्रान्स्फर करण्यात आले असे डॉ किरीट सोमैया यांनी यावेळी सांगितले.
याबाबतचे तारीखवार तपशीलही डॉ किरीट सोमैया यांनी सादर केले.