मागील काही दिवसांमध्ये राज्यात येणारे अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले. महाराष्ट्रात होणारी कोट्यवधींची गुंतवणूक परराज्यात गेली. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत होते. हा वाद मागे पडलेला असतानाच राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यास काहीही नुकसान होणार नाही, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांच्या याच विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज ठाकरेंच्या विधानावर बोलताना ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, अशी खोचक टीका केली.
शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचा धंदा सुरू केला आहे. राज्यातून दोन नव्हे तर पाच मोठे प्रकल्प गुजरात आणि दिल्लीमध्ये गेले आहेत. त्या प्रकल्पांच्या जोरावरच मोदी यांनी गुजरातची निवडणूक जिंकली. महाराष्ट्र कंगाल केला आणि गुजरातचं भलं केलं. राज ठाकरे याकडे गांभीर्याने पाहात नाहीत हे मनसेचे दुर्दैव आहे, अशी खोचक टीकाही केली.
राज ठाकरे मुलाखती दरम्यान म्हणाले, महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे.
राज ठाकरे यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन तेथील भागात रोजगार निर्माण होतील, असे अजित पवार म्हणाले.