मराठी ई-बातम्या टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिवस सकाळी लवकर सुरु होतो आणि रात्री उशीरा संपतो. त्यातच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा स्विकारल्यापासून तर अजित पवार कामे प्रशासकिय कामे आणि राजकिय कामे प्रलंबित राहू नये यासाठी वेळेचे नियोजन करत त्याचे काटेकोर पालनही करतात. त्यानुसार आज सक्काळी सकाळी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईच्या दौऱ्यावर निघाले.
या दोघांनी पहिल्यांदा महालक्ष्मी रेसकोर्सवर बांधण्यात आलेल्या सायकल ट्रॅकची पाहणी करून तेथून जवळच असलेल्या धोबीघाटाची पाहणी केली. त्यानंतर सातरस्ता, गाडगे महाराज चौक नुतनीकरण, पोलिस कॅम्प ते वरळी सी फेस पादचारी पुलाचे नुतनीकरण, वरळी नरिमन भाट जेट्टीचे सुशोभिकरण, दादर चैत्यभूमी व्हिविंग डेक आणि माहिम रेतीबंदर बीच सुशोभीकरण आदी कामांची पाहणी केली.
विशेष म्हणजे या दौऱ्यात अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता राजकिय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्यांमध्ये होती.
अखेर त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांनी त्यांना माहिम येथील रेतीबंदर बीचवर गाठून याबाबतची विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली असता ते म्हणाले की, सदरचा दौरा हा खाजगी दौरा होता. त्यामुळे याची माहिती प्रसारमाध्यमांना कळविली नाही.
गाडीचे स्टेअरींग आदित्य ठाकरेंच्या हाती असल्याने महाविकास आघाडीचे स्टेअरींगही मग त्यांच्याच हाती आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी उपस्थित केले असता ते म्हणाले की, गाडी चालवणं हे प्रत्येकाचं पॅशन असतं आणि आम्ही एकत्र काम करत करतो. त्यांनी गाडी चालविली म्हणून वेगळा अर्थ काढू नका अशी सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतली असे सांगत त्याबाबत स्पष्ट बोलण्याचे त्यांनी टाळले. दरम्यान त्यांनी आदित्य ठाकरे करत असलेल्या कामांचे कौतुक केले.