नाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप शिर्डी मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशामुळे नाराज होत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, बबनराव घोलप यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर बबनराव घोलप यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. भेटीनंतर बबनराव घोलप म्हणाले, मी राऊत साहेबांना भेटलो त्यांना माझे म्हणणे सांगितले आहे. त्यांनी एक दोन दिवसात साहेबांची वेळ मिळवून देतो असे सांगितले आहे. त्यामुळे वाट पाहिन असे घोलप म्हटल्याचे समजते. मला तयारीला लागा असं सांगितले होते. मग आता मध्येच हे काय झाले? मग ते काढून घेणार असाल तर हे पद तरी कशाला म्हणून मी राजीनामा दिला. दोन दिवसात ठरेल काय ते सगळे. जर तरला उत्तर देण्यात आताच काही अर्थ नाही, असेही स्पष्ट केले.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, वाकचौरेंना घेतलं म्हणजे उमेदवारी दिली असं होत नाही. बबनराव घोलप हे गेल्या ५० वर्षांपासून निष्ठावंत सैनिक आहेत. कोणाला कोणतं पद द्यायचं हा निर्णय पक्षप्रमुखांचा असतो. त्यांना उमेदवारी दिली होती. पण काही कारणांमुळे त्यांना माघार घ्यावी लागली. यंदा पुन्हा त्यांच्या नावाचा विचार सुरू होता. भाऊसाहेब वाकचौरेंनी प्रवेश केला म्हणजे त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही.
दरम्यान, बबनराव घोलप यांच्या राजीन्याम्या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पदं येतात जातात त्यात काय, उद्धव साहेब त्यांना यापेक्षा मोठी जबाबदारी देणार असतील असं बोललं जात असल्याचा दावा केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबनराव घोलप हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशामुळे घोलप नाराज झाले. शिर्डीमधून वाकचौरे यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सुरू असताना नाराज होत घोलप यांनी राजीनामा दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यात देखील बबन घोलप यांना डावलण्यात आल्याची माहिती समोर आली होती.