राज्याच्या राजकारणात इतके दिवस अभेद्य मानले जाणारे पवार कुटुंबिय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे भ्रष्ट पार्टी असा उल्लेख करताच शरद पवार यांचे पुतणे आणि राजकारणातील दादा व्यक्तीमत्व अजित पवार यांनी झटकन उडी मारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यातच पुणे येथे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची एक गुप्त बैठक झाली. मात्र ही बैठक कौटुंबिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एक प्रकारची संभ्रमवस्था निर्माण झाली असतानाच शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका विषद केली.
आमदार रोहित पवार म्हणाले, या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी त्यांची भूमिका अनेकदा स्पष्ट केली. शरद पवार यांनी काल १३ ऑगस्ट रोजी सोलापुरात पत्रकार परिषदेत या भेटीवर स्पष्टीकरणही दिलं. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. एवढ्या मोठ्या नेत्याला तुम्हा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सातत्याने भूमिका स्पष्ट करावी लागत असेल तर ते योग्य नाही. त्यांनी एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर ती आपल्याला स्वीकारावी लागेल.
आमदार रोहित पवार म्हणाले, मला असं वाटतं की, ही सगळी भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे. हे जे संभ्रमाचं वातावरण आहे, ते सातत्याने राहिलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. जेणेकरून भाजपाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे ही कदाचित भाजपाचीच करणी असावी. हे लोक (भाजपा) मुद्दाम अशी चर्चा सातत्याने घडवून आणत आहेत.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर स्वतः शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांच मत मांडताना म्हणाले, रोहित पवार, शरद पवार यांची वक्तव्ये मी पाहिली. शरद पवार म्हणाले ते माझे पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचीसुद्धा नातीगोती सांभाळायची वगैरे वक्तव्ये मी ऐकली. पण मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचं? हा प्रश्न आहे. उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर किंवा त्यांच्या बेईमान गटाबरोबर रोज चहा प्यायला बसायला लागलो तर काय होईल? आम्ही नेत्यांनी त्यांच्याबरोबर बसायचं, नातीगोती सांभाळायची आणि खाली कार्यकर्त्यांनी मग आपल्या विचारसरणीसाठी एकमेकांविरोधात लढायचं? शिवसेनेच्या डीएनएमध्ये असं ढोंग नाही असे सांगत उपरोधिक टोला शरद पवार यांना लगावला.
संजय राऊत म्हणाले, ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. त्यात महाभारताप्रमाणे स्वकीय, मित्र, नातीगोती यांची पर्वा आम्हाला करता येणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. लोकांमध्ये संशय आणि संभ्रम येईल अशी भूमिका किमान भीष्म पितामहांकडून तरी अपेक्षित नसल्याचे सांगत स्पष्ट केलं.