Breaking News

सुनील तटकरे यांचं मोठं विधान; तिघेही एकत्र एनडीए म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आपलं स्थान डळमळीत झाल्यानंतर संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते

आपलं स्थान डळमळीत झाल्यानंतर संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते त्यामुळे त्या कार्यशैलीकडे मी जास्त काही पाहू शकत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी समाचार घेतला. जयंत पाटील यांनी काही आमदार संपर्कात असल्याचे आज भाष्य केले होते त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सुनिल तटकरे यांनी कोण कुणाच्या संपर्कात आहे हे माध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितले.

ज्यांनी वक्तव्य केले तेच आमच्या संपर्कात आहेत हे स्पष्ट करतानाच त्याबद्दल अधिक काही बोलू शकत नाही आणि त्यांना नावे सांगायची असतील तर त्यांना तो अधिकार आहे. एखादा अपवाद सोडता उरलेले सर्व आमदार आदरणीय अजितदादा पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यापैकी काही दरमंगळवारी होणार्‍या विधीमंडळ बैठकीला आमदार उपस्थित असतात त्यामुळे कोण कुणाच्या संपर्कात आहेत हे सर्वांना माहित आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

राज्यभरात मिळणारा केविलवाणा प्रतिसाद लक्षात घेता असे वक्तव्य त्यांनी करणे हे स्वाभाविक आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी यावेळी लगावला.
कधी कुणाचा करेक्ट कार्यक्रम होईल ते काही आता सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे मी वारंवार सांगत आलो आहे की, जयंत पाटील यांच्या पोटातील पाणी हालत नाही आणि डोळ्यातील पाणी टिकत नाही त्यामुळे करेक्ट कार्यक्रमाबाबत ते वारंवार बोलतच असतात. करेक्ट कार्यक्रम हा शब्दप्रयोग प्रचलित झाला तो जयंत पाटील यांच्यामुळेच त्यामुळे बघुया कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतो ते असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

 

मराठा समाजाला आरक्षण हवे आहे ते ओबीसीमधून हवे आहे तर धनगर समाजाला हवे आहे ते एसटी राखीव म्हणून हवे आहे त्यामुळे दोन्ही समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या वेगवेगळ्या पध्दतीच्या आहेत. जरांगे पाटील यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे परंतु दोन्ही आरक्षणातील संदर्भ वेगळे असल्यामुळे शेवटी जे काही ते ठरवतील ते पहायला मिळेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे परंतु ओबीसी आरक्षणाला जराही धक्का न लावता ही आमची आजही भूमिका आहे त्यामुळे यासंदर्भातील निर्णय राज्यसरकारने कायदेशीर कसोटीवर तपासून दिला पाहिजे. अशा पध्दतीचे निर्णय दोनदा घेतले गेले. काही ठिकाणी शैक्षणिक अंमलबजावणी झाली आणि तेवढ्यातच सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय रद्दबादल ठरवले. राज्यसरकारने न्यायाधीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे ती समिती राज्यभर फिरुन माहिती घेऊन एक अहवाल देतील याचा अर्थ असा आहे की, राज्यसरकार सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

एका मराठा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही तीव्र भावना प्रत्येक समाजात असते परंतु इतकं टोकाचं पाऊल व्यक्तीगत जीवनात उचलून जीवनच संपवणं ही बाब आम्हा सर्वांसाठी गंभीर आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

लोकसभेच्या जागा आम्ही लढणार आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीला तिन्ही पक्ष सामोरे जातील त्यावेळी राज्यपातळीवर आमची चर्चा होईल. आमच्या तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील. यासंदर्भातील अंतिम निर्णय दिल्लीतील शिर्षस्थ नेत्यांकडून होईल पण एक बाब नक्की आहे की, कोण किती जागा लढवणार हे आज सांगू शकत नाही परंतु तिघेही एकत्र एनडीए म्हणून, महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात फक्त ८ टक्के महिलांना उमेदवारी

देशात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. देशांतर्गत एकूण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *