पुणे : प्रतिनिधी
राज्यातील एकेकाळचे समाजवादी चळवळीचे अर्धव्यु भाई उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचे सोमवारी सांयकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांना स्वादू पिंडाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर पूना हॉस्पीटल येथे उपचार करण्यात येत होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा अभिजित, सून आणि नातवडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या मंगळवारी सांयकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
भाई वैद्य हे राज्याच्या राज्य मंत्रिमंडळात जवळपास दोन वर्षे गृह राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच अंथरूणाला खिळे पर्यत राज्यातील विविध सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा राबता होता. तसेच राज्यात कोणत्या प्रश्नावर नवे आंदोलन उभे राहतेय याची नेहमी विचारपूस करत रहायचे. तसेच संबधितांना गरज वाटल्यास फोन करून मार्गदर्शनही करत.
भाई यांच्यावर आठ महिन्यापूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. मात्र त्यांना तीन आठवड्यापूर्वी स्वादुपिंडांचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर पूना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना अति दक्षता विभागात स्थलांतरीत करण्यात आले. परंतु त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारांना त्यांचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे मागील दोन तीन दिवसात त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नेते व माजी गृहराज्य मंत्री भाई वैद्य यांच्या निधनामुळे मूल्याधिष्ठित संघर्ष करणारे नेतृत्व हरपले, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी सहवेदना व्यक्त केली.