राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या टीकाकर असलेल्या आणि स्व.वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर स्तुतीसुमने उधळीत अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीला चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पवार कुटुंबातील या राजकिय नाट्यावर कट्टर टीकाकार आणि विरोधक समजल्या जाणाऱ्या शालिनीताई पाटील यांनी भाष्य केल्याने अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. शालिनीताई पाटील या साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांना शहाजोगपणाचा सल्लाही दिला.
शालिनीताई पाटील म्हणाल्या, वसंतदादा पाटील यांच्या काळात शरद पवार यांनी केलेल्या बंडामागे एक विचार होता. अजित पवार यांनी केलेल्या बंडामागे कोणताही विचार नाही. केवळ त्यांना सत्ता आणि संरक्षण हवं आहे. केलेल्या अपराधांना झाकण्यासाठी त्यांना संरक्षण पाहिजे. त्यासाठी सत्तेत जायचं आहे. पण असल्या बेसवर ते फार काळ टिकणार नाहीत असे म्हणाल्या.
तसेच पुढे शालिनीताई पाटील म्हणाल्या, शरद पवार मुत्सद्दी राजकारणी आहेत. धूर्त आहेत. ते कुणाला माफ करत नाहीत. २०२४ पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्या आधीच ते हिशोब चुकता करतील, असं मोठं विधानही केलं आहे. शालिनीताई पाटील यांनी अनेक महत्त्वाचे दावेही केले आहेत.
यावेळी बोलताना शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांना सल्ला देताना म्हणाल्या, ज्येष्ठ म्हणून माझा अजित पवार यांना सल्ला राहील. अर्थात तो मानावा अथवा मानू नये. त्यांनी केलेली ही चूक आहे, असं मला वाटतं. ते भाजपाकडे गेले म्हणजे आश्रयाला गेले आहेत. अपराध केले आहेत. त्यामुळे लपवायला गेले. लोकशाहीत अनंत काळ हे टिकत नाही. परिस्थिती बदलते. नवे लोक येतील. सत्य हे सत्यच असते, असं सूचक विधानही केलं.
भाजपाच्या राजकारणावर बोलताना शालिनीताई पाटील म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील लोक सत्य सांगत नाहीत. मोदींना हे सत्य कळेल तेव्हा ते विचार करतीलच ना. एवढे मोठे अपराध केल्यानंतर न्यायालयाने एफआयआर दाखल करायला सांगितले आहेत. ही साधी गोष्ट नाही. जे संरक्षण देतील त्यांना उद्या याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. त्यांनी विचार करावा अशी विनंती राहील, असंही म्हणाल्या.
शरद पवार यांनीच अजितदादा यांना भाजपाकडे पाठवल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य करताना या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगितलं. शरद पवार असला प्रयोग करणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट करताना शालिनीताई पाटील म्हणाल्या, आताची परिस्थिती वेगळी आहे. ऐनवेळी शरद पवारांना सोडून जायचं होतं असं नाही. तुम्हाला भाजपाकडे जायचं होतं तर भाजपाच्या तिकीटावर उभं राहा. किंवा तुम्हाला वेगळा पक्ष काढायचा असेल तर वेगळा पक्ष काढून लढा. तुमच्या वागण्याला तात्त्विक बेस नाहीये. तुम्ही दरोडे घालून आलाय आणि संपत्ती लुटण्यासाठी सत्तेचा कौल मागत आहात. हे वर्षभरात जनतेपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जनता त्यांना साथ देणार नाही, असा सूचक इशाराही दिला.