राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी सूचविल्याप्रमाणे मराठा समाजातील सग्या सोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणीही राज्य सरकारने मान्य केली. शिवाय मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलन मागे घेतल्याचे जाहिर करत आंतरावली सराटी गावी परत माघारी फिरले.
तर दुसऱ्याबाजूला मराठा समाजाला कुणबी समाजाला मिळणाऱ्या ओबीसी आरक्षणातील आरक्षणात वाटा दिल्याने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ओबीसी नेते छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नव्या सुधारीत मसुद्यावर टीका केली. तर ओबीसी संघटनेचे नेते बबनराव तायडे यांनी मात्र राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणात टक्का मिळवून देण्यासाठी मराठा समाजाला खुष केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे राज्य सरकारच्या या सुधारीत जात प्रमाणपत्र वाटपाच्या नियमावलीत सुचविण्यात आलेल्या सुधारीत मसुद्यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात झाली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर एक पोस्ट करत मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करत आता आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्री यांना विचारा असा खोचक टोला लगावला. त्याचबरोबर राज्यातील मराठा भगिनी आणि बांधवाना खरी परिस्थिती समजेल असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, विविध कायदेतज्ञांमध्ये मराठा समाजाच्या सग्या सोयऱ्यांसाठीही आरक्षणाची तरतूद करणारा नवा सुधारीत मसुदा जाहिर करण्यात आल्याने राज्य सरकार मराठा आंदोलकांसमोर सपशेल शरणागत झाल्याचे चित्र राजकिय वर्तुळात निर्माण झाले आहे. याशिवाय राज्य सरकारने सगेसोयऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतूदी न्यायालयीन लढाईत टीकणार नसल्याची भूमिका काही कायदे तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही…
— Raj Thackeray (@RajThackeray) January 27, 2024