Breaking News

रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात शासकीय कार्यालयासमोर घंटानाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांची उद्या १ फेब्रुवारी रोजी ईडी कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी केंद्र सरकार विरोधात घंटा नाद करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांची २४ जानेवारी रोजी ईडी कडून १० तास चौकशी करण्यात आली होती. ईडी कडून रोहित यांना पुन्हा उद्या एक फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर रोहित दादा पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन आणि घंटानात आंदोलन करण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते शासकीय कार्यालयासमोर घंटा नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

पुढे बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं असताना देखील नोटिसा बजावण्यात येत आहे. देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर लोकशाही असेल आणि हुकूमशाही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात शिंदे सरकारने जाहीर केली नसेल तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे. ईडीच्या वतीने विरोधात असलेल्या लोकांविरोधात कारवाई करण्यात येत होती. मात्र नंतर भाजपा सोबत सत्तेत सहभागी झालेल्या यामिनी जाधव, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी या लोकांच्या चौकशीच काय झालं. यामध्ये २० ते २२ जणांची मोठी यादी आहे.या सर्व चौकशा थंड का पडल्या आहेत. या सर्वांनी भाजप समोर गुडघे टेकल्यामुळे आणि भाजप सोबत सत्तेत आल्यामुळे यांच्या चौकशी बंद झालेली आहे. भाजपसोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी जर यांनी भ्रष्टाचार केला होता. तर मग या भ्रष्टाचारी फौजेला मोदी सरकारने आपल्या छत्र छायेत घेतल्यामुळे यांच्या चौकशी बंद झाल्या आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आमदार रोहित पवार भाजपच्या समोर गुडघे टेकत नसल्याने त्यांची चौकशी सुरू आहे असल्याचा आरोपही केला.

… सरकार विरोधात आवाज उठवत असल्यानेच रोहित पवार विरोधात चौकशीची कारवाई-विकास लवांडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांची ईडी कडून करण्यात येत असलेली चौकशी हास्यास्पद व निंदनीय आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना यासंबंधी चौकशी केली जात आहे, खरं तर २०१२ साली या कारखान्याचा राज्य सहकारी बँकेवर प्रशासक असताना, कायद्याच्या तरतुदीनुसार, नियम अटी ठेऊन २ वेळा लिलाव काढला होता. दोन्ही वेळा कोणी बोलीसाठी आलं नव्हतं. तिसऱ्या बोलीमध्ये रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमीटेड या कंपनीने ४५ कोटी रुपये किंमत असलेला कारखाना ५० कोटी २० लाख रुपयांनी रितसर, नियमांनुसार खरेदी केले होते. या कारखान्याच्या अनुषंगाने काही FIR वा तक्रार नव्हती. उलट तो विकत घेतल्यानंतर त्याला मॉडिफाय करून, सुधारणा करून त्यामध्ये अनेक उपपदार्थ प्रकल्प सुरू केले. त्या कारखान्यामुळे त्या भागातील ऊस उत्पादकांना उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. ऊस उत्पादकांची तेथे काही तक्रार नाही. शिवाय सुरेंद्र अरोरा, ज्यांनी २०१५ मध्ये त्या राज्य सहकारी बँकेसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका केली होती. त्या याचिकेवर २०१९ मध्ये त्याचा निकाल आला. त्या निकालातही रोहित पवार व बारामती अॅग्रोचा कुठेही उल्लेख नाही. उलट, ज्यांची नावं यात आहेत, त्यांची चौकशी का केली जात नाहीये? लिलाव झाल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरू झाली होती. त्याचं काय झालं? ज्या कारखान्याच्या संदर्भात अण्णा हजारे यांनी तक्रार केली होती, त्याचं काय झालं? असा सवाल प्रश्न केला.

पुढे विकास लवांडे म्हणाले की, आमदार रोहित पवार यांच्या विरोधातील ही चौकशी राजकीय सूडबुद्धीने केली जात आहे. रोहित पवार बेरोजगारीचा प्रश्न, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा-धनगर-लिंगायत यांच्यासाठीचं आरक्षण यांवर आवाज उठवत असल्याने सरकार अडचणीत येत आहे. रोहित पवार हे अजित पवार मित्रमंडळासोबत गेले असते तर ही चौकशी लागली नसती हे त्रिकालबाधित सत्य आहे. याच्या निषेधार्थ, उद्या आम्ही काही ठराविक लोक उपोषण करणार आहोत. उद्या रोहित पवार ईडी कार्यालयात गेल्यानंतर बाहेर येईपर्यंत अन्नत्याग करणार आहोत असे सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *