मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला अल्टीमेटम देत सरकारच्या धोरणाविरोधात उपोषणाचे हत्यार मनोज जरांगे पाटील यांनी उपसले. अखेर जरांगे पाटील यांच्या मागण्यासमोर राज्य सरकारने माघार घेत एका महिन्यात ओबीसी समाजातील कुणबी समुदायाला मराठा आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा सुरु केला.
तसेच मनोज जरांगे पाटील यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने मराठा आरक्षण प्रश्नी जनजागृतीचे काम सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त जेथे ठिकठिकाणी मराठा समाचाकडून उत्स्पूर्दपणे स्वागत करत आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे राजकिय वजन आणि पाठिंबाही वाढताना दिसत आहे.
हे स्वागत होत असताना मनोज जरांगे पाटील यांना आता राजकारणात उतरणार का असा सवाल करण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपली आगामी राजकिय भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, राजकारणात जायची इच्छा नाही. मी मराठा समाजाची सेवा करतोय. मला नेता बनायचं नाही. मराठा समाजाला अनेक पिढ्यांपासून आरक्षणाच्या वेदना आहेत. त्यासाठी हा लढा उभा राहिला आहे. त्यामुळे १०० टक्के मराठा आरक्षण मिळणारच.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील तो प्रश्नच तुम्ही मला विचारू नका. ते माझ्या डोक्यात नाही. ती आपली वाटच नाही. आपली वाट एकच आहे, मराठा आरक्षण हीच आपली वाट. समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे.