कर्जत येथील मंथन शिबीरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राजीनामा मागे घेण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठाण येथे आंदोलन करण्यासाठी राजीनामा दिलेल्या दिवशी सिल्वर ओक निवासस्थानी आनंद परांजपे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना घरी बोलावून आंदोलन करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर शरद पवार गटाचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुमच्या घरात काय चालले आहे याचे मला काय करायचे आहे. पण ज्या माणसाने बारामतीत राजकिय जन्म दिला. त्या अजित पवारांनी आपल्याच काकांवर असे गंभीर आरोप करण्यासाठी माझे नाव घेण्याचा संबध काय असा सवाल करत उगाच बदनाम करण्यासाठी शरद पवार यांच्यावर खोटे नाटे आरोप करण्याइतके अजित पवार हे काही मोठे नेते नाहीत अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अहो ज्या माणसाच्या नावावर आम्ही आमदारकी लढविल्या, ३०-३५ वर्षे राजकारण करतो. त्या माणसावर अशा पध्दतीचे आरोप करणे हे बालिश राजकारणाचे लक्षण आहे असा खोचक टोला लगावत आपली राजकिय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याच काकाच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला असा सवालही उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या पवार कुटुंबात तुम्ही जन्माला आलात म्हणून अख्खी तयार बारामती मतदारसंघ तुम्हाला मिळाला. तुम्हाला पहिल्यांदा खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं. त्याच काकाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. अन आज तुम्ही सगळं मिळाल्यावर म्हणताय मी दुसऱ्याच्या घरात जन्माला आलो हा काय माझा दोष आहे का पण शेवटी तुमचं मुळ तिथेच ना अशी टीकाही अजित पवार यांच्यावर केली.
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले, जर तुम्ही आव्हाडाच्या घरात जन्माला असतात ना तर तुम्हाला बारामतीत कोणी विचारलं तरी असतं का असा खोचक सवाल करत पुढे म्हणाले, मला कोणी भाजपासोबत येणार का म्हणून कोणी विचारलं नाही ना माझी कधी जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा कधी झाली नाही. त्यामुळे मला याबाबत कोणतीच माहिती नाही. पण जर मला आंदोलन करायचं असेल तर मला शरद पवार यांच्या परवानगीची गरज नाही. मला जो मुद्दा पटला, तर मी स्वतःच आंदोलन करतो असेही यावेळी स्पष्ट केले.
शेवटी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी कोणाच्या नादाला लागत नाही आणि कोण नादीला लागला तर त्याला सोडत नाही. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या आरोपाशी माझा काहीही संबध नाही. शेवटी राजकारणात पण एक मर्यादा असतात, त्या मर्यादा कधी सोडायच्या नसतात. पण स्वतःच्या राजकिय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी असली बालीश राजकिय भाषणबाजी करू नये.