देशात संविधान तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. आमदार हा खरेदी-विक्री संघ आहे, की कांद्याचा भाव आहे अशी टीका पक्षाचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्हाला शरद पवारसाहेब लागतात. आता अचानक तुम्ही म्हणता की, आम्हाला शरद पवार नको. तुम्ही साहेबांचा चेहरा का वापरता. तुम्ही मतदारांना आकर्षित करू शकाल असे चेहरे वापरावे. तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता. ज्याला गुरु बोलायचे त्यालाच दुःख द्यायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पवार साहेबांना जखमी करून टाकलंय. पण हा जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जे आमदार पवार साहेबांसोबत आहेत ते वाचतील अन्यथा इतर सर्व घरी जातील, असा स्पष्ट इशाराही दिला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार माझी खासगी मालमत्ता आहे का अशी विचारणा केली जाते. मात्र ही सरंजामशाहीची पद्धत माझ्यात नाही. मी त्यांच्या पायाची धूळ आहे. पण जेव्हा बापावर येते तेव्हा छातीचा कोट करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. इथे सर्व पांडव आहेत आणि आपला श्रीकृष्ण हे शरद पवार साहेब आहेत. इतिहास सांगतो की अधर्माविरोधात धर्माची लढाई होते, तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही. नाशिकला साहेब येणार तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हान दिले.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र वर्मा, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, आमदार सुनिल भुसारा, आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, आमदार सुमन पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार चेतन तुपे, आमदार बाळासाहेब पाटील आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार एकनाथ खडसे, खासदार वंदना चव्हाण, खासदार फौजिया खान आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.