राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तर हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आले होते त्यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून विविध विषयांवर भूमिका मांडली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, शासकीय यंत्रणा विशेषतः पोलिस यंत्रणा जी पावले टाकते त्या यंत्रणेला सर्वसामान्य माणसांनी सहकार्य द्यायची गरज आहे. आपण सर्वांनी यंत्रणेला सहकार्य केले तर परिस्थिती तातडीने बदलली असे चित्र आपल्याला बघायला मिळेल. कोल्हापूर शहर अथवा अन्य शहरांना सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी शांतता निर्माण केलीच पाहिजे असे मतही यावेळी व्यक्त केले.
त्याचबरोबर शरद पवार यांनी सांगितले की, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, ताराराणींचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे. काही लोक चुकीचे वागत असतील पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर, राज्य शासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल, शांतता प्रस्थापित होईल आणि त्याला सर्वांनी साथ द्यावी एवढेच आवाहन असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी दुधाला मिळणाऱ्या दरावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा आहे. तसेच जिथे जिराईती शेती आहे तिथे दुधाचा व्यवसाय हा त्या कुटुंबाचा संसार चालवतो. दुधाची किंमत इतकी घसरली आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते अजिबात योग्य नाही. यासाठी मी स्वत: राज्य सरकारशी विचार विनिमय करून त्यांना यातून मार्ग काढण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासनही दिले.
राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली गेली, मात्र त्यावर कृती दिसत नाही. काल विदर्भात असताना एक गोष्ट लक्षात आली. मागील अतिवृष्टी आणि गारपिटीसाठी जी नुकसान भरपाई जाहीर झाली ती अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. ही चांगली गोष्ट नाही. शेवटी काळ्या आईशी जो ईमान राखतो, लोकांच्या भुकेचा जो प्रश्न सोडवतो त्याला संकटाच्या काळात शासनाने मदत केली पाहिजे. बळीराजाचा हा आग्रह काही चुकीचा नाही. त्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न माझ्यासारखे लोक निश्चित करतील अशी ग्वाहीही शरद पवार यांनी दिली.