परभणी: प्रतिनिधी
मराठवाडा, विदर्भात गारपीट होवून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. मात्र राज्य सरकारकडून अद्यापही पंचनामेच करण्यात येत असून कोणतीही मदत देण्यात आली नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.
जालना जिल्ह्यातील वंजार उम्रज येथील गारपीटीमुळे मृत्यू पावलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची खा. अशोक चव्हाण यांनी भेट घेत सांत्वन केले. तसेच शिंदे यांच्या कुटुंबियांना एक लाख रूपयांची आर्थिक मदतही काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे माजी आ. कैलाश गोरंट्याल आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर या गारपीटीत मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली मात्र या जनावरांचे पोस्ट मार्टेम केल्याशिवाय ही मदत देणार नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या दारात गारपीटीत मृत पावलेल्या जनावरांचे मृतदेह तसेच पडून राहीले असून या जनावरांच्या पोस्ट मार्टेमसाठी अद्याप सरकाच्या पशु वैद्यकीय डॉक्टरांचे पथकही फिरकले नाही. त्यामुळे या जनावरांची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने त्याचा परिणाम स्थानिक नागरीकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करत हा सारा प्रकार हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेची भेट घेत तलाठ्याला समज देऊन मृत जनावरांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शिष्टमंडळाच्यावतीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.