भाजपा-काँग्रेस दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमांची पर्वा नाही, अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.
प्रकाश आंबेडकर यांनी देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांना सावध करत म्हणाले की, तुमच्या एका बाजूला जातीयवादी भाजपा-आरएसएस आहे. जे एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात, द्वेष पसरवण्यात, जातीयवादाचे विष पसरवण्यात आणि मृत्यूच्या ठेकेदाराचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे लाचार काँग्रेस पक्ष आहे. जो मतांच्या जोगव्यासाठी “मोहब्बत की दुकान” म्हणत खुळखुळा वाजवत आहे.
पुढे प्रकाश आंबेडकर यांनी सवाल करत म्हणाले, परंतु, आमचे काय? आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेले आहे का? आम्ही ह्या भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम सतत कलंक, भेदभाव आणि हिंसाचाराचे, अत्याचारानेग्रस्त असलेले बहिष्कृत जीवन जगत आहोत आणि आपल्या स्त्रिया जगातील सर्वात अत्याचार पीडित महिला आहेत.
भाजपा-आरएसएस आणि काँग्रेस या दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांची पर्वा नाही. त्यांना सत्ता वाटून घ्यायची नाहीये, तर सर्व सत्ता फक्त आपल्यातच ठेवायची आहे, असा हल्लाबोलही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा-कॉंग्रेस पक्षावर केला.
दरम्यान, हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे मुस्लिम आमदार मम्मन खान यांच्या अटकेविरोधात काँग्रेस नेतृत्वाकडून काही निषेध किंवा वक्तव्य करण्यात आले आहे का? असा थेट सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारत काँग्रेसवर सडकून टीका केली.
तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझ्या मुस्लिम बंधू-भगिनींसाठी हा चिंतनाचा विषय आहे की, जेव्हा काँग्रेस नेतृत्व स्वतःच्या मुस्लिम आमदारासाठी उभे राहू शकत नाही, तेव्हा तुम्ही आणि मी त्यांच्याकडून संपूर्ण मुस्लिम समाजासाठी उभे राहण्याची अपेक्षा कशी करू शकतो? काँग्रेसला प्रेमाच्या दुकानात रस नाही. तर त्यांना फक्त “स्वतःचे दुकान” उभारण्यातच रस आहे! असा घणाघाती हल्ला त्यांनी काँग्रेस केला.