नागपूर : प्रतिनिधी
राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन विविध कामे याशिवाय तुम्हाला दिल्लीला जायचे असल्याने तिकडचेही कामकाज तुमच्या डोक्यावर आहे. किती तुमची ओढाताण होतेय. तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे का जबाबदारी सोपवित नाही? का तुमचा कोणावर विश्वास नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेतच विचारत त्यांची राजकिय कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
विधानसभेत लक्षवेधीवरील चर्चेच्या दरम्यान मधेच अजित पवार हे उठत आजच्या कामकाज पत्रिकेतील विधेयकांची भरमसाठ संख्यने दाखविल्याचा मुद्दा उपस्थित केला.
तसेच आमचे सरकार असताना सत्ताधारीचे प्रस्ताव आले नाहीत. तर ते आम्ही काढून टाकायचो. परंतु विरोधकांचे प्रस्ताव आम्ही घ्यायचो. मागील आठवड्यातील विरोधकांचे दोन आणि सत्ताधाऱ्यांचा एक असे प्रस्तावही आजच्या कामकाजात दाखविले आहेत. त्यात आता पुन्हा आमचा नवा प्रस्ताव येणार असतानाही त्यावर अद्याप चर्चा नाही. त्यामुळे हे प्रस्ताव लवकर घेण्याबाबत निर्णय घ्यावा अशी सूचनाही त्यांनी केली.
परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्हालाच लक्ष द्यावे लागत असल्याने तुमच्यावर मोठा ताण आहे. त्यामुळे तुमच्या काही जबाबदाऱ्या मुनगंटीवार, पाटील आणि तावडे यांच्याकडे दिल्यास त्यांनाही काम मिळेल आणि तुमचाही भार हलका होईल. मात्र तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही का? असा मिश्किल सवाल केला.
त्यावेळी अजित पवार यांच्या सवालावर प्रतित्तुर देण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रयत्न करत होते. मात्र अजित पवारांच्या शेवटच्या गुगलीमुळे त्यांनी शांत राहणेच पसंत केले. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर कोणतेही भाष्य करण्याचे टाळत कामकाज पत्रिकेतील बदलाची माहिती देणे पसंत केले.