राज्यातील काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ख्याती असलेल्या अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच १५ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यातच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसमधील अनेक विद्यमान आमदारही त्यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. तसेच अशोक चव्हाण यांचे समर्थक असलेले अनेक नगरसेवक आणि कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारीही पक्षाचा राजीनामा देणार असल्याची एकच चर्चा सुरु झाली. या सगळ्या घडामोंडीवर अशोक चव्हाण यांनी स्वतःच राजीनामा देण्यामागील काही कारणे स्पष्ट करत आपण कोणत्याही आमदाराला संपर्क करत नसल्याचेही प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, “आज मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेन असेही सांगितले.