Breaking News

राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा उद्धव यांचा प्रयत्न…… हिंदूहृदयसम्राटाचा मुलगाच हांजी हाजी करतोय ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी!- शिवसेना खा. राहुल शेवाळे आणि आ. उदय सामंत यांची टीका

देशभरातील सर्व भ्रष्ट नेते मुंबईत पर्यटनासाठी आले आहेत. एकेकाळी वंदनीय बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या नेत्यांची सरबराई करण्यासाठी हिंदुहृदयसम्राटांचा मुलगाच हांजी हांजी करत फिरत आहे. त्यामुळे या दुभंगलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांचा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार व मंत्री उदय सामंत यांनी केली. I.N.D.I.A. च्या प्रत्येक अक्षरामध्ये टिंब आहे. हे टिंबच त्यांच्यातली फूट दर्शवतं. या आघाडीने कितीही प्रयत्न केले, तरी २०२४ मध्ये लोकसभेत आम्ही मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली ३७५ जागा जिंकू आणि महाराष्ट्रात २१५ पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेने उद्धव गटाला दिलेल्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. मुंबईत आलेल्या नेतेमंडळींना उद्धव यांनी बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी नेऊन त्यांच्या स्मृतिंना वंदन करायला लावावं. तेवढी धमक उद्धव यांच्यात आहे का, असा सवाल त्यांनी पुन्हा उपस्थित केला. तसंच ही आघाडी भ्रष्ट नेत्यांची आघाडी असून जनता त्यांच्या या स्टंटला भूलणार नाही, असंही ते म्हणाले.

घोटाळेबाजांची टोळी एकत्र

देशातील मोठमोठे घोटाळे करणाऱ्या घोटाळेबाजांची टोळी मुंबईत एकत्र आली आहे. चारा घोटाळा, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, दिल्ली दारू घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, मुंबईतल्या जंबो कोविड सेंटरचा घोटाळा असे कित्येक लाख कोटी रुपयांचे घोटाळे करणारे २६ पक्षांचे चाळीस चोर एकत्र आल्याची टीका खा. राहुल शेवाळे यांनी केली.

२०२४ मध्ये येणार तर मोदीच!

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आदरणीय मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली NDA ३७५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणेल. तसंच महाराष्ट्रातही आमचे २१५ पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. त्यामुळे विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली, तरी त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

मुंबई महाराष्ट्राचीच!

निवडणुका जवळ आल्या की, पावसाळ्यातल्या बेडकांसारखे काही नेते ‘केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी डाव आखत असल्या’ची ओरड करतात. पण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, हे फक्त याच लोकांना वाटत असतं, असा शेलका आहेर उदय सामंत यांनी विरोधकांना दिला. आम्हीही महाराष्ट्रात राहतो. आमचंही मुंबईवर प्रेम आहे. त्यामुळे मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्यांचाच तसा हेतू आहे की काय, अशी शंका आता आम्हाला येते, असा प्रतिहल्लाही त्यांनी चढवला.

पर्यटन करा आणि परत जा!

मुंबईत वर्षभर पर्यटक येतात आणि पर्यटनाचा आनंद लुटतात. आताही हे देशभरातील नेते पर्यटनासाठी आले आहेत. आदित्य ठाकरेंनी त्यांना राणीच्या बागेतील पेंग्विन दाखवावेत आणि परत पाठवावं. पंतप्रधान मोदीजींचा सामना करण्याची कुवत आणि ताकद यापैकी एकाही नेत्यामध्ये नाही. या नेत्यांनी फक्त आपापल्या मुलांची राजकीय भवितव्यं टिकवण्यासाठी या बैठकीचा घाट घातला आहे. पण त्यांनी पर्यटन करावं आणि परत जावं, असा सल्लाही खा. राहुल शेवाळे यांनी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *