साधारणतः वर्षभरापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात शिवसेनेच्याच ४० आमदारांनी बंड पुकारत भाजपाशी सवता सुभा केला. त्यानंतरही शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत संभाजी ब्रिगेडने युती करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर संभाजी बिग्रेड आणि उध्दव ठाकरे यांच्यात आज मंगळवारी ३० मे शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र राजकिय वर्तुळात संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटात राजकिय वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकर बैठक होणार आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्तिक मेळावा होणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संभाजी ब्रिगडेचे महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रवक्ते गंगाधर बनबरे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरविंद सावंत यांनी सांगितलं की, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर यांची बैठक एक वर्षापूर्वी झाली होती. त्या बैठकीत संभाजी ब्रिगेडने स्पष्ट भूमिका घेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आहोत, असं सांगितलं होतं. मधल्या काळात राजकीय आणि सामाजिक अशा बऱ्याच उलथापालथी झाल्या, तरी संभाजी ब्रिगेड उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिली.
महाराष्ट्रासह देश संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. अशावेळेला मुलभूत प्रश्नाकडं दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्ष कोणत्याही विषयाला राजकीय रंग देत भ्रम निर्माण करण्याची गोष्ट करत असतात. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे. याबैठकीनंतर ऑगस्ट महिन्यात दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा मुंबईत होणार आहे, अशी माहितीही अरविंद सावंत यांनी दिली.