Breaking News

राज्यात पाळणाघर योजनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन

पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तयार करण्यासाठी तसेच ही योजना राबविताना शासकीय, अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, कामगार, गृह आणि महिला व बालविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार असून चौथ्या महिला धोरणात पाळणाघराबाबत निर्णयाचा समावेश करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मुंबई शहर व उपनगर परिसरात सार्वजनिक खाजगी स्वरूपात डे केअर सेंटर सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशिबेन शहा, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, प्रेरणा संस्थेच्या प्रिती पाटकर, स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, मुंबई मोबाईल क्रशेसच्या वृषाली नाईक, माधवी भोसले, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी, युनिसेफच्या कामिनी कपालिनी यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ज्या मुलांचे पालक नोकरी अथवा कामानिमित्त बाहेर आहेत अशा मुलांसाठी कौटुंबिक व सुरक्षित वातावरणात संगोपन होण्यासाठी पाळणाघर ही संकल्पना काळाची गरज बनली आहे. फक्त शहरीच नाही तर ग्रामीण भागातील ० ते ६ व ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी पाळणाघर सुरू करावीत. आगामी महिला धोरणात पाळणाघराबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.

शहरी व ग्रामीण भागात पाळणाघर होणे ही काळाची गरज – ॲड. सुशिबेन शहा

महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशिबेन शहा म्हणाल्या की, आजही मुलांना सुरक्षित निवारा उपलब्ध नसल्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांसमोर मोठा प्रश्न असतो. जास्तीत जास्त डे केअर सेंटर ग्रामीण व शहरी भागात सुरू झाल्यास बालकांसाठी सुरक्षित निवाऱ्याची उपलब्धता होणार आहे. त्यामुळे काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढण्यास निश्चितच मदत होईल. तसेच कुपोषण, बालकांचे लैंगिक शोषण, मुले शाळाबाह्य होण्याचे प्रमाणदेखील कमी होणार आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि अशासकीय संस्थांच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील विभागीय स्तरावर आठ मार्चपर्यंत प्रत्येकी किमान एक डे केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ॲड. शहा यांनी सांगितले.

यावेळी विविध सामाजिक संस्थांनी पाळणाघरासाठी शासनाची निश्च‍ित नियमावली असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

महिला बचत गटांना माविमने व्यवसायाभिमुख मार्गदर्शन करावे

राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी महिला बचत गट आहेत. या महिला बचत गटांतील सदस्यांना व्यवसायाभिमुख मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. बचतगटातील सदस्यांना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत अधिकाधिक मार्गदर्शन देऊन बचत गटांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड, महाव्यवस्थापक कुसुमताई बाळसराफ, रविंद्र सावंत माविमचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील ९९ हजार ६९९ बचतगटांना शहरी भागातील ६५ हजार ३३० बचतगटांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात यावे. ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. ई-बिझनेस प्लॅटफॉर्ममध्ये महिलांचा सहभाग वाढवावा. शाश्वत विकासासाठी माविमने बचत गटांसाठी योजना सादर कराव्यात, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम, केंद्रपुरस्कृत योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रम, स्वयंसहाय्यता बचत गट, माविमचे ध्येय व उद्दीष्टे, नाविन्यपूर्ण उपक्रम याची सविस्तर माहिती यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड यांनी दिली.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *