मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीवर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जमली गावातील कंत्राटी शिक्षक रणजित बाबासाहेब आव्हाड याने उडी मारून आंदोलन केले. हा तरुण धरणग्रस्त असून सरकार कडून त्याला अद्याप नोकरी दिली गेली नाही. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र त्याला जाळीवरून बाहेर काढताना सुरक्षा रक्षकांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे यावेळी दिसले.
मंत्रालय सुरक्षा पोलिसांनी या तरुणाला जाळीवरून उतरवून पुढील कारवाईसाठी मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या हवाली केले. त्याच्या हातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे केलेला विनंती अर्ज होता.
यापूर्वी या संरक्षक जाळीवर शेतकरी संघटना तसेच मराठा आरक्षण संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या जाळीवर अन्यायग्रस्त जेव्हा पोलिसांच्या नजरा चुकवून आंदोलन करतात तेव्हा मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना ती एक प्रकारे करमणुक वाटते. मंत्रालया वरुन उडी मारून कोणाचा जीव जाऊ नये यासाठी सरकारने जाळी बसवली. मात्र आंदोलक या जाळीवर आंदोलन करतात, त्यामुळे मंत्रालयीन पोलिसांची डोकेदुखी वाढली.