मुंबईत रिक्षा टॅक्सीचालकांकडून जवळचे भाडे नाकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी आजवर आल्या असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्री-बेरात्री भाडे नाकारले जाणे असो किंवा मग जवळचे नाकारले जाणे असो, यामुळे मुंबईकरांना अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते तर काहींना मनस्ताप सहन करावा लागतो.
मात्र आता भाडे नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या मनमानीला चाप बसवण्यासाठी आरटीओ कार्यालयांनी व्हॉट्सअॅप क्रमांक ९१५२२४०३०३ दिला आहे. त्यावर आतापर्यंत ९०० हून अधिक तक्रारी आल्या असून त्यातील ७०५ तक्रारी या भाडे नाकारण्याच्या आहेत. तसेच या तक्रारी नुसार कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.
तसेच प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तपासात दोषी आढळणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचालकांवर अनुज्ञप्ती निलंबन, परवाना निलंबन आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे अशी माहिती वडाळा आरटीओचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी माहिती दिली आहे.
एकतर रिक्षाचालकांनी भाडे नाकारले तर आधीच चिडचिड होते आणि त्यात एखाद्या महत्वाच्या कामासाठी जायचे असेल तर वाद घालण्यातही काही उपयोग वाद घालण्यातही काही उपयोग नसतो. रिक्षा, टॅक्सीचालक अनेकदा लांबपल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात त्यामुळे प्रवाशांची चिडचिड होते.