मुंबईः प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत पुढील २ ते ३ दिवसात नुकसान भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झाल्यानंतर ते येथे बोलत होते. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, डॉ. अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, विजय शिवतारे, डॉ. सुरेश खाडे, महादेव जानकर उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या २ ते ३ दिवसात नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच प्रत्यक्ष स्थितीचे अवलोकन करून मदतीचा तपशील लवकरच ठरवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. याव्यतिरिक्त विमा कंपन्यांकडून सुद्धा मदत देण्यासंबंधी सरकार त्यांच्या संपर्कात आहे. पंचनाम्यांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मोबाईलने घेतलेल्या छायाचित्रांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करीत आहोत, परंतु त्याची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.
Tags cm fadnavis farmers loss monsoon rain vijay shivtare