Breaking News

मोदी हटाव देश बचाव…संविधान बचाव …देश बचाव…इन्कलाब जिंदाबाद राजगृह ते चैत्यभूमी संविधान पालखी; परिसर युवाशक्तीने फूलुन गेला

मुंबई: प्रतिनिधी

हम सब एक है…इनकलाब जिंदाबाद…संविधान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…लाठीकाठी खायेंगे संविधान बचायेंगे…मोदी हटाव देश बचाव अशा घोषणा देत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करत आज देशातील १४ युवा संघटनांनी अभूतपूर्व अशी संविधान बचाव रॅली काढली.

देशातील १४ राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र येवून ‘यूनायटेड यूथ फ्रंट’च्या माध्यमातून ही संविधान बचाव रॅली आयोजित करण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहापासून या संविधान बचाव रॅलीची सुरुवात झाली.त्यावेळी भारतीय संविधानाची पालखी तयार करण्यात आली होती आणि त्या पालखीमध्ये भारतीय संविधानासह युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ विराजमान करण्यात आले होते.

चैत्यभूमी येथे या संविधान रॅलीची सांगता झाली.त्यावेळी सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी आपल्या भाषणात जे सरकार संविधानाचा सन्मान करु शकत नाही ते सरकार सत्तेत राहण्यास योग्य नाही.त्यामुळे या गुंग्या आणि बहिऱ्या सरकारच्याविरोधात युनायटेड यूथ फ्रंटने आवाज उठवायला सुरुवात केली असल्याचे सांगितले.देशाचे संविधान आमचा अभिमान असल्याचे धीरज शर्मा यांनी स्पष्ट केले.

तुमची आमची लोकशाही आज धोक्यात आली असून त्यामुळेच देशातील १४ संघटनांचे युवा अडचणीत सापडलेले संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले असल्याची माहिती माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली. आज देशातील सर्व समाज,महिला,शोषित समाज अडचणीत सापडला आहे आणि यांना वाचवणारे संविधानही आज संकटात असून संविधानाच्या सन्मानासाठी युवक मैदानात उतरल्याचे स्पष्ट केले.

आज राममंदिर आणि मस्जिदची चर्चा सुरु आहे परंतु भाजप सरकार हा विषय तुमच्याजवळ काढण्यासाठी येईल त्यावेळी त्यांना आमच्या रोजगाराचे काय झाले,अच्छे दिनाचे आश्वासन काय झाले असा जाब विचारा असे आवाहन गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले. शिवाय त्यांनी भीमाकोरेगाव दंगलीतील मोदींचे गुरु भिडे यांनी दलितांना मारले परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल न होता दलितांवरच अन्याय-अत्याचार केला जात असल्याचे सांगतानाच भीमाकोरेगाव दंगलीतील भिडे यांच्यावर फडणवीस तुम्ही कधी कारवाई करणार असा सवालही केला.

आज देशाचे संविधान धोक्यात आले असून या देशाचे सजग नागरीक म्हणून संविधान वाचवण्यासाठी एक व्हा आणि एकत्र या असे आवाहनही आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले.

देशाचे संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्यासाठीआपल्या प्राणाची आहुती दयायला लागली तरी त्यासाठी आपण तयार राहायला हवे असे आवाहन पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी यावेळी केले.

देशातील असंख्य जनता संविधान धोक्यात आल्याचे सांगतआहे.त्यामुळे आता देशातील प्रत्येक घराघरामध्ये जावून संविधान धोक्यात असल्याचे सांगण्याची गरज असून त्या माध्यमातून जातीवादी व मनुवादी सरकारला बाहेर फेकण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन जेएनयूचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी केले.

या देशातील ना हिंदू धोक्यात आहे ना मुस्लिम धोक्यात आहे.धोक्यात आहे ते संविधान असे स्पष्ट केले… संविधान बचाव रॅलीच्या सभेत कन्हैयाकुमार यांनी मोदी-शहा यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.

भारतीय घटनेच्या उभारणीचे कार्य ज्यांनी केले त्याला धक्का लावण्याची ताकद मोदी-शहामध्ये नाही. ही ताकद नवतरुणामध्ये आहे. युवा उतरले तर आणि ही ताकद एकसंघ केली तर २०१९ मध्ये या देशाच्या घटनेला धक्का लावण्याची हिंमत कुणाची होणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभेत केले.

संविधान बचाव रॅली ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहापासून सुरु झाली त्यावेळी या रॅलीमध्ये १४ युवा संघटनांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचे  युवा नेते हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विदयार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, काँग्रेसचे मुंबई युवक अध्यक्ष गणेश यादव, राष्ट्रवादीचे मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रविकांत वरपे, सरचिटणीस सूरज चव्हाण आदींसह समविचारी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *