Breaking News

काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरात मंजूर केले “हे” दोन ठराव

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांकडून विविधस्तरावर कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी कार्यकर्त्या-पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. काँग्रेसनेही आज कार्यकर्ता-पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन लोणावळ्यात केले. या शिबिरात काँग्रेसने दोन महत्वाचे ठराव मंजूर केले. त्यातील एक ठराव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार संग्राम थोपटे यांनी दुसरा मांडला. या दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला ठराव

भाजपाने ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करुन पक्ष फोडण्याचे काम केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून पाडले. विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोडून विरोधी पक्षच गिळंकृत करण्यात आले. या गैरकृत्यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाला काळीमा फासत त्यांना मदत केली. आज तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. हा फक्त खाती गोठवण्यापुरता मर्यादीत नाही हा लोकशाही आणि संविधानाचा गळा दाबण्याचा प्रकार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत आहे. माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने हा ठराव एकमताने मंजूर केला.

दुसरा ठराव.-

केंद्रातील भाजपाचे नरेंद्र मोदी सरकार संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमशाही वृत्तीने काम करत आहे. मोदी सरकार आपल्या धोरणांमधून देशातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, अल्पसंख्यांक, शेतकरी, तरूण, महिला या सर्व समाजघटकांवर अन्याय करत आहे. देशातील हजारो शेतकरी दोन वर्षापूर्वी काळे कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी वर्षभर आंदोलन करत होते. या आंदोलनात जवळपास एक हजाराहून अधिक शेतक-यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारने हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते पण ते पाळले नाही त्यामुळे दोन वर्षानंतर पुन्हा लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

सरकार त्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांच्या मार्गात खिळे ठोकत असून रस्ते बंद करून शेतक-यांवर अश्रू धुरांची नळकांडी फोडत आहे. पेलेट गन्सचा वापर करत आहे. यात शेकडो आंदोलक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. आपले नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्याबरोबर हमी भावाचा कायदा करू असे सांगितले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी असून शेतक-यांचा आवाज दडपणा-या केंद्रातील मोदी सरकारचा धिक्कार करत आहे. हा ठराव आमदार संग्राम थोपटे यांनी मांडला तर विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. सुरेश वरपुडकर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एकमताने हा ठराव मंजूर केला.

या शिबीराला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, गोवा, दीव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, अमित देशमुख, सुनिल केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, AICC सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *