मुंबई : प्रतिनिधी
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. या ४ वर्षपूर्ती निमित्त भाजपकडून उत्साह साजरा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात या कालवधीत निर्यात घटली, बेरोजगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. निवडणूकीपूर्वी ज्या घोषणा दिल्या त्या सर्वच घोषणा या त्यांच्या जुमला निघाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मोदी सरकारच्या चार वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी जुमला किंग नावाची सिरीज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मिडीया विभागाने सुरु केलेल्या जुमला सिरिजचे उद्घाटन आणि प्रकाशन काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंघवी यांच्याबरोबरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रवक्ते सचिन सावंत, सचिव पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते.
देशाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या कृषी क्षेत्राचा विकास दर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा विकास दर हा ४.२ टक्के इतका होता. मात्र या सरकारच्या काळात हा दर १.९ टक्केवर आला आहे. तसेच मागील ४ वर्षात कृषी मालाला ५० टक्के वाढीव दर देण्याची घोषणा करूनही या काळात त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. मात्र आता निवडणूकांना १ वर्षे राहील्यानंतर कृषी मालाला आता वाढीव दर देण्याचे आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
निवडणूकीच्या आधी भाजप सरकारने २ कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात आता रोजगार तर सोडा उलट सुशिक्षित तरूणांना पकोडे तळण्याचे काम करा म्हणून सल्ले मोदी आणि शाह देत आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पनामा सारख्या ब्लँक मनीच्या घटना उघडकीस आल्या. मात्र याप्रकरणात एकालाही अटक करण्यात आली नाही. विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी सारख्या ९ लोकांनी ६१ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्यावरही काही कारवाई केली नसल्याचा आरोप करत कुठेत अच्छे दिन असा सवाल करत हे दिवस तर दुखवटा वर्षे असल्याची टीकाही त्यांनी केली.