Breaking News

शरद पवारांविषयी आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

शरद पवारांबरोबर आमच्या पण भावना आहेत,मात्र आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळी आम्हालादेखील अश्रू अनावर झाले होते याची आठवण करून देतानाच सारखे – सारखे अश्रू आणून जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील असे वाटत नाही अशी मिश्किल टिप्पणीही आनंद परांजपे यांनी केली.

माझ्याकडे पक्षाने ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्यामागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही भूमिका असल्याचे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती मी घेईन. निवडणुकीत पडणारी मते ही पक्षाची ताकद असते त्यामुळे त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न असल्याचेही आनंद परांजपे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संघटनेचे पद द्या अशी मागणी केली होती हे सांगतानाच आता निवडणूक आयोगात लढाई सुरु झाली आहे. चिन्ह, पक्षाबाबत जी भूमिका घ्यायची ती भूमिका निवडणूक आयोग घेईल असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

अविनाश जाधवांना नाटकी आंदोलने व कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याची सवय आणि स्थायीभाव 

मनसेचे नेते अविनाश जाधव यांचे नाटकी आंदोलन करायची आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे ही त्यांची सवय आणि स्थायीभाव आहे असा थेट हल्लाबोल माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे.

आज ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंदोलनस्थळी आले होते. त्यानंतर आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
या टोल दरवाढीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतील. या आंदोलनातून मात्र काही साध्य झाले नाही. हा ठाण्यापुरता विषय नाही तर मुंबईच्या एन्ट्री पाॅईंटसंदर्भातला प्रश्न आहे. त्यामुळे एमएच – ०४ संदर्भात दिलासा दिला पाहिजे अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे.

आज राज ठाकरे ठाण्यात अविनाश जाधव यांचे उपोषण सोडण्यासाठी आले होते. ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. अविनाश जाधव यांनी साखळी उपोषणाचे आंदोलन करुन कार्यकर्त्यांना वेठीस धरले. राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटले तर या टोल दरवाढीवर तोडगा निघू शकतो असे सांगतानाच दर तीन वर्षांनी ५ रुपये वाढत असतात. २०१० पासून ते २०२६ पर्यंत हा करार झाला आहे असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

२०१० साली हा झालेला करार आहे. राज्य शासनाने असा निर्णय घेतलाय त्यामुळे कंत्राटदार यातून लहान गाड्यांना मुंबई एन्ट्रीवर टोलमुक्ती देत नाही. टोलचा प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती मिळावी अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे. अविनाश जाधव हे नेहमीच वादग्रस्त विधाने करत असतात. खळखट्ट्याक करुन हे आंदोलन सुटणार नाही असा उपरोधिक टोलाही आनंद परांजपे यांनी यावेळी लगावला.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *