Breaking News

नारायण राणे म्हणाले, उध्दव ठाकरे लबाड लांडगा… मुख्यमंत्री असल्याचा काळ हा महाराष्ट्राचा काळीमा

उद्धव ठाकरे खरं बोलत नाहीत, ते अत्यंत खोटारडे आहेत. युती असताना काल-परवापर्यंत उद्धव ठाकरे अमित शाहना फोन करत होते. मला भाजपात घेऊ नये, मंत्रिपद देऊ नये यासाठी ते शेवटपर्यंत अमित शाहांना फोन करत होते. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत. ते अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले हा महाराष्ट्रासाठी काळिमा आहे. त्यांनी काहीही केलं नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

काल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना भाजपावर आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्या हल्ल्याला प्रत्त्युतर देण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत टीका केली.

आज मराठी माणसावर बोलतात, त्यांनी किती मराठी मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत? किती मराठी माणसांना घरं दिली आहेत? याचं उत्तर त्यांनी द्यावं असा सवाल करत उलट मराठी माणूस हद्दपार झाला. मराठी माणूस वसई, पनवेल अशा दूरवरच्या भागात निघून गेला. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एका मातोश्री बंगल्याचे दोन बंगले केले. १९६६ मध्ये मराठी माणसाची मुंबईतील टक्केवारी किती होती आणि मुख्यमंत्री असताना २०२० मध्ये किती होती? असा खोचक सवालही त्यांनी केला.

नारायण राणे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे केवळ बढाई मारतात. आदिलशाह, अफजल खान, अमूक-तमूक आणि हे शाह असा यांचा इतिहास आहे. असं बोलताना यांना काहीच वाटत नाही का? अशी टीका गुन्हा आहे. उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जावं लागेल. गिधाड वगैरे कुणाला उद्देशून बोलले आहात? ही वक्तव्य तुरुंगाचा रस्ता दाखवणारी आहेत असा इशाराही उध्दव ठाकरे यांना दिला.

खोक्यांचा विषय तर आहेच. त्याची चौकशी होणार आहे. त्यातून उद्धव ठाकरेंची सुटका झालेली नाही. सुशांत प्रकरणातूनही तुमच्या मुलाची (आदित्य ठाकरे) सुटका झालेली नाही. आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही असे भाकितही त्यांनी यावेळी केले.

शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते, असं म्हणत खोचक टोला लगावला. तसेच उद्धव ठाकरे आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे, आता गटप्रमुखांची बैठक घेतात, इथपर्यंत आले आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनी जमीन दाखवा असं वक्तव्य केल्याचं म्हणाले. मात्र, त्याचा अर्थ त्यांना कळाला नाही. शाहांना जमिनीवर या असं म्हणायचं होतं. आता हे म्हणतात आम्ही ‘आसमान’ दाखवू. उद्धव ठाकरे असं कोणाच्या जीवावर म्हणत आहेत? तेव्हापासून शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. ते १९९९ मध्ये शिवसेनेत सक्रीय झाले. मी मुख्यमंत्री झालो आणि त्यांना घरून कोणीतरी सांगितलं की राणे मुख्यमंत्री झाले, तूही कार्यरत राहा, मुख्यमंत्री होशील. म्हणून ते शिवसेनेत आले. तोपर्यंत ते शिवसेनेत सक्रीय नव्हते. एवढी आंदोलनं झाली, शिवसैनिक लढत होते, मार खात होते, एन्काऊंटर होत होते, तुरुंगात जात होते तेव्हा हे कोठे होते? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी विचारला.

उद्धव ठाकरेंना ६२ वं वर्ष सुरू आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का? पक्षवाढीसाठी कधी संघर्ष केला का? ते काहीच न करता सरळ मुख्यमंत्रीपदावर आले. तेव्हा मी म्हणालो होतो की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत अशी टीका करत ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत राणेंनी ठाकरेंना खोटारडा म्हटलं. तसेच मला भाजपात घेऊ नका, मंत्रीपद देऊ नका म्हणून उद्धव ठाकरे अमित शाहांना शेवटपर्यंत फोन करत होते, असा गंभीर आरोप केला.

अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची लायकी तरी आहे का? असा सवाल करत नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या नखाऐवढे तरी काम केलेय का कधी? असे म्हणत जर पुन्हा भाजपाचे नेत्यांवर टीका केलात किंवा माझे मित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबतच्या ४० जणांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही असा इशाराही नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांना दिला.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *