मुंबईतील शासकिय सावित्रीबाई फुले वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली.
महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्य सरकारचा अप्रोच आहे त्यावरुन ते गंभीर दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्याने कृत्य केले त्याने आत्महत्या केली. त्यामुळे आता पहिल्यांदा वसतीगृहाची सुरक्षितता, त्यामध्ये हेल्पलाईन असतील, अलार्म बेल आणि कॅमेरे यांना प्राधान्य देत सरकारने लवकर पाऊले टाकली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडत त्या पुढे म्हणाल्या, डाळींचे दर वाढले आहेत याचे मला आश्चर्य वाटत नाही. कारण दोन वर्ष सातत्याने संसदेत वाढत्या अन्नधान्याच्या किंमतीवर बोलत आहे. केंद्र सरकारकडे स्टडी पॉलिसी नाहीय. कांद्याची जगात कमतरता होती, परंतु महाराष्ट्रात सरप्लस कांदा होता त्यावेळी कांदा एक्स्पोर्ट करा असे आम्ही सांगत होतो मात्र तो केला नाही. आज ना कांद्याला भाव नाही ना इतर वस्तूंना आहे. शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामध्ये केंद्र सरकारचे सातत्याने गैरव्यवस्थापन दिसून येते असा थेट हल्लाबोलही केला.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या, मला गंमत आणि आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की, जेव्हापासून भाजपा सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून सारखे वातावरण दुषित का होते आहे असा थेटही केंद्र आणि राज्य सरकारला केला.
औरंगजेबाच्या प्रतिमेवरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, नगरची घटना घडली आता कोल्हापूरमध्ये घटना घडली आहे. सारखेच तणावाचे वातावरण राज्यात कसे होते असा सवाल करतानाच अशाच गोष्टी घडत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर यामुळे राज्याचे नुकसान होणार अशी भीती व्यक्त केली. शिवाय जनता ही घाबरलेली व बिथरलेली आहे, त्यामुळे हे गृह मंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोपही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला.
वाढत्या महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातून किती विरोध होतो आहे हे आता भाजपाच्या लक्षात आले आहे. आंदोलन करणार्या मुलींचे गार्हाणं ऐकायला इतके दिवस का लागले? याचा अर्थ त्यांना अपयश दिसत आहे, देशातून रोष दिसत आहे. या देशातील प्रत्येक महिलेला राग आला आहे. ज्या सरकारने ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला त्यांनी त्यांच्या बेटीला न्याय दिला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपाच्या विरोधात द्वेष आणि राग आहे. आंदोलनकर्त्या मुलींवरील अन्याय केला आहे ही चूक भाजपाच्या लक्षात आल्यावर शेवटी ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोलाही भाजपाला लगावला.
मुंबई येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुंबईत घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत ना केंद्र सरकार गंभीर आहे ना राज्य सरकार…
जिथं महिला वसतिगृहे आहेत तेथे सीसीटिव्ही कॅमेरे, दर्जेदार अशी लॉकींग सिस्टिम, सुरक्षाव्यवस्था… pic.twitter.com/i5YnQ1Y58L
— Supriya Sule (@supriya_sule) June 7, 2023