नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : केंद्र सरकारने आगामी 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. अचानक बोलावलेल्या या 5 दिवसीय विशेष अधिवेशनात नेमकी कुठल्या विषयावर चर्चा होणार यावरून राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जात आहेत.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून अमृतकालात 18 ते 22 सप्टेंबर असे 5 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी या ट्विटमध्ये बाकीचे तपशील दिलेले नाहीत. त्यामुळे राजकीय तर्क वितर्कांना जोरदार उधाण आले आहे.
एकीकडे “इंडिया” आघाडीतल्या सर्व विरोधकांनी मोदी सरकारच्या दिशेने आपल्या तोफा वळविल्या आहेत. अदानी पासून दुष्काळापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांची हत्यारे सर्व विरोधक परजत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार या विशेष अधिवेशनात नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणणार आणि आपल्याला हवा तसा अजेंडा सेट करणार या विषयांवर तर्क वितर्क सुरू झाले आहेत. या विशेष अधिवेशनात समान नागरी कायदा किंवा अन्य कुठला विषय चर्चेला आणणार का..? यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.