राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार, त्यांना पक्षात पु्न्हा संधी दिली जाणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते पक्षउभारणीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी पक्षाची रणनिती कशी असणार, तसेच सोडून गेलेल्या नेत्यांविषयी शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांते लक्ष लागले होते. अखेर शरद पवारांनी यावर भाष्य केलं असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार म्हणाले की, कळत नकळत आपल्यातील काही सहकारी हळूच एक शंका काढतात. आता झालंय ते ठीक आहे, आम्ही कामाला लागतोय, परंतु, ते परत आल्यावर काय? अशी शंका मला आजही अनेकांकडून विचारली जाते. ते आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपण यासंबंधीचे निर्णय घेणार नाही”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वेगळी भूमिका घेऊन शिवसेना आणि भाजपशी हतमिळवणी करत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे बोलले जात आहे.
रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७० ते ८० जागा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना शरद पवारांनी या बैठकीत दिल्या.