मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरची डेड लाईन देऊन महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला प्रारंभ केलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असे सांगतानाच जरांगे यांचा बोलावता धनी कोण असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान या आरोपावर जरांगे पाटील यांनी उत्तर देताना आमच्या मागे कोण आहे, हे शोधून काढा, असे प्रतिआव्हान दिले.
मनसे नेते राज ठाकरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरु असतानाच त्यांनी चालविलेल्या मराठा आंदोलनाबाबत शंका उपस्थित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिला. याविषयी ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली मनोज जरांगे पाटील स्वत: बोलतायत की त्यांचा बोलावता धनी कोण वेगळा आहे, यातून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण निवडणूका तोंडावर असताना या सर्व गोष्टी होतायत हे काय सरळ चित्र दिसत नाही, असे आरोपही राज ठाकरे केला.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, कोणतीही गोष्ट होणार नाही. हे मी जरांगे यांच्या तोंडावर सांगून आलो होतो. २५ डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोलाही लगावला.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर या सर्व गोष्टी घडवल्या जात आहेत, हे इतकं सरळ चित्र नाही, या मागे कोण आहे हे कळेलच,. लोकांचं लक्ष विचिलत करण्यासाठी असले मुद्दे बाहेर काढले जात असल्याची शंका उपस्थित करत येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी योग्य भूमिका घ्यायला हवी, राजकीय पक्षांना, नेत्यांना मतदारांची भीती वाटली पाहिजे, नुसतं सुशिक्षित असून चालणार नाही तर सुज्ञ व्हावं लागेल,असे आवाहनही यावेळी बोलताना केले.
दरम्यान राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना मनोज जरांगे- पाटील म्हणाले की, यामागे कोण आहे हे राज ठाकरें यांनीच ते शोधून काढावे आणि त्याचं नाव त्यांनी लवकरच स्पष्ट करावे असे प्रतिआव्हान देत या पाठीमागे कोण आहे ते सगळ्यांनी शोधलं आहे. राज ठाकरेंनी पण शोधावं. आम्हाला पण सांगावं, त्यावेळी तुम्ही सांगाल ते आम्ही करतो असे आव्हान दिले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला तर याचा शोध लागला नाही पण, यामागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे असे स्पष्ट करत मराठा सामाजाचं कल्याण व्हायला लागलं की, असे खोटे आरोप आणि पुड्या सोडल्या जातात. पंरतु मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि आम्ही ते मिळवणार असा निर्धारही व्यक्त केला.