देशातील लोकसभा निवडणूका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण घराणेशाहीवर सातत्याने टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा केंद्रातील सत्ता हवी आहे. त्यामुळे घराणेशाहीतील अनेक राजकिय नेत्यांनी आर्थिक लाभ घेतला असल्याचा आरोपही भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातूनच मुळ शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले केंद्रातील अदृष्य महाशक्तीच्या पाठिब्यांने करण्यात आली. आता खरा पक्षाचा खरा नेता कोण यावरून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेनेच्या दोन्ही गटात चांगलेच राजकारण सुरु झाले आहे. या वादाची चुणूक आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चांगलेच वाक्ययुध्द रंगल्याचे दृष्य पाह्यला मिळाले.
आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेत तरूण पिढीने सोबत येत राष्ट्रवादीवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. यावेळी शरद पवार म्हणाले की, केंद्रातील सत्ता ज्या पक्षांच्या हाती आहे. ते देशातील सामाजिक ऐक्याला धक्का लावणारी धोरणे अवलंबत आहेत. केंद्र सरकार हे असंवेदनशीलच नाही तर शेतकर्यांच्या जीवावरच उठलं आहे. कांदा, गहू, तांदूळ यांच्या निर्यातीवर बंदी, खत आणि अन्न अनुदानात कपात, हमीभावाची नुसतीच हमी, स्वस्त खाद्यतेलाची आयात यापैकी कुठलीच गोष्ट शेतकर्यांसाठी आशादायी नाही. बळीराजाची दुर्दशा जिथे; देशाची अधोगती तिथे! सत्ता हेच एकमेव ध्येय असलेल्या सरकारला येत्या निवडणूकीत जनतेनेच धूळ चारायला हवी असे आवाहनही केले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकारच्या एकदंरीत धोरणावरून असे दिसते की केंद्र भाजपाचे धोरण झुंडशाहीच्या रस्त्याकडे चालताना दिसत आहे. परंतु जनतेला झुंडशाही आवडत नाही. त्यामुळे योग्यवेळी जनता त्यांना जागा दाखवेल अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
तर पुण्यातच अजित पवार गटाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी आतापासून कामाला लागा असे आवाहन केले.
त्यानंतर अजित पवार हे आपले अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की, पक्षातील काही नेते उठसूठ मुख्यमंत्री पदी अजित पवार अशी घोषणा देत आहेत. मात्र माझी सगळ्यांना सूचना आहे की, उगीच उठसूठ मुख्यमंत्री पदा बद्दल बोलू नका. मुख्यमंत्री पदाबाबत थोडीशी कळ सोसा अशी सूचना करत सध्या लोकसभा निवडणूका तोंडावर येत असून त्याची तयारी करण्याची जबाबदारी सर्वांनी पक्ष वाढीच्यादृष्टीकोनातून पार पाडावी असे आवाहनही केले.
तसेच अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांचे नाव न घेता म्हणाले की काहीजण आता शेवटची निवडणूक आहे असे भावनिक आवाहन करतील. पण या भावनिक आवाहनाला बळी पडू नका अशी सूचना पक्ष नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करत कधी होणार त्यांची शेवटची निवडणूक असा उपरोधिक सवालही यावेळी केला.
अजित पवार यांनी केलेल्या भावनिक आवाहनाच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शरद पवार म्हणाले, मी तर गेल्या वर्षीच जाहिर केले आहे की मी निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे शेवटी निवडणूक म्हणून भावनिक आवाहन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचेही स्पष्ट केले.