Breaking News

जलजीवन मिशनसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक

जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वात जास्त ४० टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहेत. परंतु उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या दृष्टीने जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वीतेसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज शहरातील गुरू दक्षिणा हॉल येथे जिल्हा परिषद, नाशिक आयोजित जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा २ जलरथ उद्घाटन सोहळा प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलरथांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचा पोत सुधारून ती जमीन सुपीक झाली आहे व उत्पादकता वाढली आहे. जलसंधारणाच्या दुसऱ्या टप्प्यासही आपण मागील वर्षात सुरवात केली असून जवळपास ४०९ जलसाठ्यांमध्ये काम करण्यात आले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला व जवळपास ६६७ कोटी लिटर पाणीसाठा तयार होऊन ६७ लाख टँकर यातून भरता येणे शक्य आहे.

जलस्त्रोत सुकलेले असल्यामुळे यातून माती व गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य आहे व संकटाचे संधीत रूपांतर करण्याची ही वेळ आहे. त्यादृष्टीने या कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून २४ हजार गावात काम होणार असून १६ हजार ४०५ पाणी साठे गाळ काढून पुनर्जिवीत होणार आहेत. याचा फायदा ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना थेट होणार आहे. २६७ लाख टँकर भरतील इतका पाणीसाठा याद्वारे तयार होणार आहे. अशा नियोजनातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, मागील वर्षाच्या काळात महाराष्ट्रात प्रत्यक्ष कृतीतून तलावातून गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्याचे काम भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून झाले आहे. आज उद्घाटन झालेल्या जलरथांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये जल जनजागृती संपन्न होणार आहे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले तर परिणामी इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जलजीवन मिशनच्या माध्यमातून झालेले काम निश्चितच प्रशंसनीय आहे. जलजीवनच्या माध्यमातून कोरडवाहू जमीनही बागायत झाल्या आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून छोटे नाले व नदी यावर बंधारे बांधण्यात येत आहेत. यातून पाण्याची पातळी निश्चितच वाढीस लागली आहे.

जलसंधारणाचे महत्व ओळखून मागील काळात जलयुक्त शिवार योजना सुरू केली. यात पहिल्या टप्प्यात २२ हजार गावांपर्यंत ही योजना पोहचली आहे. लोकांनीही उस्फुर्त सहभाग घेऊन यात योजनांमध्ये काम केले. यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, डिप सीसीटी, साखळी बंधारे अशा वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा उपयोग करुन गावागावांत जागृती करण्यात झाली. यामुळे पाण्याचे विज्ञान लोकांना समजले. जवळपास ७०० कोटी रूपयांचा लोकसहभाग जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभला. या योजनेच्या माध्यमातून तयार केलेले स्ट्रक्चर्स पाणी साठवून ठेवतात त्यामुळे अभूतपूर्व भूजलस्तर वाढला आहे. २०२० मध्ये सादर झालेल्या अहवालात महाराष्ट्राची जलपातळी वाढल्याचे चित्र पहावयास मिळते. बुलढाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवाराचे झालेले काम राज्यात पथदर्शी आहे. जलसंधारण कामात अनेक बीजीएस, नाम फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, चंद्रा फाउंडेशन, पाणी फाउंडेशन यासारख्या संस्थांचे कामही अधोरेखित करण्यासारखे आहे.

यावेळी ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक दिपक पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *