शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अनेक प्रकारे कमावतात. शेअर्सच्या किमती वाढण्याव्यतिरिक्त कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश आणि बायबॅकद्वारे परतावा देतात. या पद्धतींद्वारे भागधारकांना परतावा देण्यात आयटी कंपन्या खूप पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
टॉप ५ आयटी कंपन्या
टॉप ५ सूचिबद्ध आयटी कंपन्यांनी गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये लाभांश आणि शेअर बायबॅकद्वारे त्यांच्या भागधारकांना ३.२८ लाख कोटी रुपये परत केले आहेत. पाच आयटी कंपन्यांना सरासरी पेआउट ७९.६ टक्के आहे. शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध असलेल्या या पाच बड्या आयटी कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक आहेत. यापैकी टीसीएस ही सर्वात मोठी कंपनी आहे, जी देशांतर्गत शेअर बाजारातील सर्व कंपन्यांमध्ये बाजार भांडवलाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मागे आहे.
आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०१८-१९ ते आर्थिक वर्ष २०२२-२३ दरम्यान टीसीएसने लाभांश म्हणून भागधारकांना १,१७,०८७ कोटी रुपये दिले आहेत. या कालावधीत कंपनीने ५० हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची पुनर्खरेदी केली आहे. अशा प्रकारे, ९४ टक्के पेआउट गुणोत्तरासह भागधारकांना परतावा देण्यात टीसीएस आघाडीवर आहे.
इन्फोसिस दुसऱ्या स्थानावर आहे. इन्फोसिसने गेल्या ४ आर्थिक वर्षांमध्ये ५८,१३१ कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे आणि २६,७५६ कोटी रुपयांचे शेअर्स पुनर्खरेदी केले आहेत. इन्फोसिसचे पेआउट रेशो ८७ टक्के आहे. टेक महिंद्रा ७२.५ टक्के पेआउट रेशोसह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने समीक्षाधीन कालावधीत १४,८३२ कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे आणि १,९५६ कोटी रुपयांची पुनर्खरेदी केली आहे.
गेल्या ४ आर्थिक वर्षांमध्ये एचसीएल टेकने ३०,०४५ कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. तर ४००० कोटी रुपयांच्या शेअर्सची पुनर्खरेदी केली आहे. कंपनीचे पेआउट रेशो ५६.१ टक्के आहे. या कालावधीत विप्रोने ५,३९३ कोटी रुपयांच्या लाभांशासह २० हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची पुनर्खरेदी केली आहे. विप्रोचे पेआउट रेशो ४७.८ टक्के आहे.