मराठी चित्रपटातील सदाबहार अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झाल्याची माहिती पुढे आली. ते ७७ वर्षाचे होते. मागील काही महिन्यापासून रविंद्र महाजनी हे एकटेच रहात होते. तसेच ते तळेगांव दाभाडेजवळ असलेल्या आंबी या गावातील घरी ते मृतावस्थेत सापडले. ते गेल्या काही महिन्यांपासून इथं भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचं निधन दोन ते तीन दिवसांआधी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आंबी येथील एका अपार्टमेंट मध्ये ३११ नंबरच्या प्लॅटमध्ये ते रहात होते. तळेगाव एमआयडीसीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महाजनी यांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असावा. गेल्या आठ महिन्यांपासून ते एकटेच या घरात राहत होते. पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. आमच्या टीमने दरवाजा तोडला आणि फ्लॅटमध्ये महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, असंही ते म्हणाले.
रविंद्र महाजनी यांचा मुलगा व मराठी अभिनेता गश्मीर महाजनीला पोलिसांनी कळवलं आहे. गश्मीर मुंबईला राहतो, माहिती मिळताच तो तळेगाव तिथे येण्यासाठी रवाना झाला आहे. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल, तसेच मृत्यूचं कारणही कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, महाजनी यांनी ‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘झूंज’ आणि ‘कळत नकळत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे हे तिन्ही चित्रपट आजही कधी मराठी चित्रपट वाहिन्यांवर दाखविले जातात तेव्हा निम शहरी भागात मोठ्या आवडीने पाहिल्या जातात.