मुंबई महापालिकेसह राज्यातील १४ महापालिकांच्या विभागांची अंतिम प्रभाग रचना येत्या १७ मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असून त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला.
मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिप्री चिंचवड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला,सोलापूर आणि नाशिक या १४ महापालिकांनी मुदत यापूर्वीच संपलेली असून या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक केवळ इतर मागास वर्गाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर इतर मागास वर्गास राजकीय आरक्षण मिळणार नसल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानेही ही प्रक्रिया सुरु केली आहे.
प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने २८ जानेवारी २०२२ रोजी मान्यता दिल्यानंतर १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. या हरकती आणि सूचनांवर १६ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सुनावणी घेऊन त्या अंतिम करण्यात आल्या. मात्र त्यानंतर ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिल्याने अंतिम प्रारूप जाहीर करण्यात आले नव्हते.
सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी दिलेलय निर्णयानुसार निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार येत्या १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.