मराठी ई-बातम्या टीम
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आज (ता. ६) दुपारी वाजेपर्यंत होता. तो आता सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातवैधता पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्यासंदर्भातील कोणताही पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी उद्या (ता. ७) दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हे हमीपत्र असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते; परंतु राज्य शासनाने ६ डिसेंबर २०२१ रोजीच्या अध्यादेशान्वये संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांकरिता जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदतवाढ दिल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करूनही केवळ जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उशीर झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज बाद होत होते. मात्र आता ही मुदतवाढ दिल्याने जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी आता लगेच उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्याचबरोबर १२ महिन्याची मुदतवाढ दिल्याने उमेदवारांना निवडूण आल्यानंतर वर्षभराच्या आता कधीही आपले जात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. परंतु त्यासाठी हमी पत्र दाखल करणे आवश्यक आले आहे.