विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित प्रसाद लाड-अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची घोषणा

लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजपा सदस्य प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निषेधाचा ठराव मांडण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात काल संध्याकाळी शाब्दीक बाचाबाची झाली. त्यावरून भाजपाच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई कऱण्याची मागणी केली. त्यानुसार आज विधान परिषदेचे कामकाज सुरु झाले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाकडून याविषयीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे जाहिर केले.

काल संध्याकाळी अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाची नंतर उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अर्थात प्रविण दरेकर यांनी अंबादास दानवे यांच्या शिवीगाळ प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. त्यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर चालू पावसाळी अधिवेशनात पाच दिवसासाठी सभागृहातून निलंबित करण्यात येत असल्याचे जाहिर करत सभागृहात चुकीचा पायंडा पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगितले.

दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांनी आणि इंडिया आघाडीच्या सदस्याकडून या निलंबनाच्या निर्णयावर गोंधळ घालत चर्चेची मागणी केली. त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकदा निलंबन जाहिर केल्यानंतर त्यावर चर्चा करता येत नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही सभागृहात उपस्थित होते. फडणवीस यांनीही गोंधळातच विरोधी पक्षाच्या आमदारांना सांगत एकदा निर्णय झाल्यानंतर पुन्हा त्यावर चर्चा होत नसते. तसेच जर चर्चेची मागणी स्विकारली गेली तर सभागृहात चुकीचे पायंडे पडतील असेही स्पष्ट केले. मात्र सभागृहातील गोंधळ वाढल्यानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात प्रकरणाने महायुती सरकार पोखरले… इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *