खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार आहेत. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या स्थगित केली आहे. याआधीही राहुल गांधी यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने ही यात्रा स्थगित केली आहे. राहुल गांधी आज काश्मीर खोऱ्यात एकूण ११ किलोमीटर चालणार होते. मात्र काही अंतर चालल्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावरून ही यात्रा तात्पुरती स्थगित केली. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सरकारने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था केलेली नाही. अचानकपणे सुरक्षा रक्षक कमी केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला.
यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी श्रीनगरकडे जाताना बनिहाल बोगदा ओलांडला. मात्र थोड्या वेळानंतर अचानकपणे मोठी गर्दी झाली. तसेच यावेळी योग्य सुरक्षा व्यवस्था नव्हती. याच कारणामुळे राहुल गांधी यांना ही यात्रा थांबवावी लागली. या गर्दीमुळे राहुल गांधी ३० मिनिटे आपल्या जागेवरून पुढे जाऊ शकले नाहीत. गर्दी वाढल्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या वाहनामधून त्यांना तेथून बाजूला नेण्यात आले, अशी माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.
काँग्रेसचे नेते के सी वेनुगोपाल यांनी देखील मोदी सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, राहुल गांधी आणि ओमर अब्दुला यांच्या सुरक्षेसाठी तेथे पोलीस नव्हते. कोणत्याही सुरक्षेविना राहुल गांधी चालत होते. मी त्यांच्या सुरक्षेबाबात खूप चिंतेत आहे.
याआधीही राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.