कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यकता असून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ याकामी सेवाभावाने काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हे काम अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक गतीने आणि एकजुटीने करावे. कर्करोगावर मात करण्यासाठी योग्य औषध उपचारांबरोबर अत्याधुनिक आरोग्य केंद्राच्या उभारणीवर भर द्यावा लागणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केली.
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, आरोग्य सेवा तथा अभियान संचालनालयानाचे आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, टाटा मेमोरियल इस्टिट्यूटचे संचालक डॉ.सुदिप गुप्ता, कॅन्सर वॉरियर, आरोग्यसेविका, आशासेविका तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टर्स आदी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, कर्करोगाची रूग्णसंख्या वाढत असून मुंबईतील टाटा हॉस्पिटलच नाही तर प्रत्येक शहरांमध्ये सुद्धा हॉस्पिटलची आवश्यकता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेनेही यासाठी सजगतेने काम करणे गरजेचे आहे. आज चांगला आहार, जीवनशैली यामुळे आयुर्मान वाढले आहे. परंतु शेतीशी, शारीरिक श्रमाशी ज्यांची नाळ तुटली, ती माणसं मात्र साठीतच अनेक व्याधीने ग्रस्त झाली आहेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेने सूर्यनमस्कार, योगासने यांच्या प्रशिक्षणाबरोबरच कर्करोग होऊ नये यासाठी प्रबोधनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. कर्करोग मुक्तीच्या अभियानांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर येण्यासाठी सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की, कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे, त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. कर्करोगाच्या बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार आणि उपचारानंतरची पुनर्वसन प्रक्रिया या तीनही गोष्टीवर लक्ष देण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रत्येक देशामध्ये कर्करोगाच्या बाबतीत वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेपासून उपचार, संशोधन आणि वेगवेगळे उपाय यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातूनही लोकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान रायगड कर्करोग आरोग्यसेवा व मुखकर्करोग आणि कर्करोग सदृश्य या दोन माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक तर आभारप्रदर्शन संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांनी केले.
राज्यात कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणाबाबत राबविण्यात येत असलेले उपक्रम :
* राष्ट्रीय कर्कराग, मधुमेह, हृदयरोग व पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम ३४ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे.
* शासकीय रूग्णालयांमध्ये कर्करोग, मधुमेह व उच्चरक्तदाब इत्यादीकरिता तपासणी व मोफत उपचार केले जातात.
* २०१८-१९ पासून राज्यात पॉप्युलेशन बेस्ड स्क्रीनिंग हा उपक्रम सुरू आला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी ३० वर्षावरील वयोगटासाठी पाच आजारांकरिता (मधुमेह, उच्चरक्तदाब, मौखिक कर्करोग, स्तर कर्करोग, व गर्भाशय मुख कर्करोग) प्राथमिक तपासणी आशा व एएनएमद्वारे करण्यात येते. लवकर निदान करून रूग्णांना वेळेत योग्य उपचार देण्यात येत आहे.
* सन २०१८-१९ मध्ये जिल्हास्तरावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अमरावती, नाशिक, गडचिरोली, अकोला व बीड येथे कर्करोग आरोग्य सुविधा DAY CARE CENTER सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत रूग्णांना केमोथेरेपी उपचार उपलब्ध करून देण्यात येतात.
* सन २०१८-१९ पासून आजतागायत एकूण २०२८ कर्करोग रूग्णांना केमोथेरेपी सेंटरमध्ये उपचार देण्यात आले आहेत.
* राज्यात अमरावती व नाशिक या जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात आले असून त्यामध्ये कर्करोग रूग्णांना बाहृयरूग्ण, आंतररूग्ण, शस्त्रक्रिया, केमोथेरेपी सेवेसह रूग्ण व कुटुंबांना समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
* राज्यात ४ ठिकाणी रेडिऐशन ऑन्कॉलॉजीचे विभाग स्थापन करण्यात येणार आहे.
* टर्शरी कॅन्सर केअर सेंटर या योजनेंतर्गत राज्यातील कर्करोग रूग्णालयांचे बळकटीकरण अंतर्गत कर्करोग रूग्णांना माफक दरात व दारिद्र्य रेषेखालील रूग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात.