नागपूर : प्रतिनिधी
राज्यातील शेतीवर बोंडअळी आणि तुडतड्याचा प्रादुर्भाव झाल्याप्रश्नी मांडण्यात आलेली लक्षवेधीला राज्य सरकारकडून अद्याप उत्तर आलेले नसल्याने पुढे ढकलण्यात आल्याची विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केले. त्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या लक्षवेधीवर आताच चर्चा घेण्याची मागणी केली. त्यामुळे अध्यक्ष बागडे विरूध्द विरोधक असा सामना विधानसभेत पाह्यला मिळाला.
बोंडअळी व तुडतुड्याच्या प्रादुर्भावासंदर्भात उत्तर न आल्याने ही लक्षवेधी सूचना उद्या घेवू असे जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी असे प्रकार होणे गंभीर असून राज्य सरकारला समज देण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्ष बागडे यांनी आपल्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातही अशा महत्वाच्या विषयात लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे लक्षवेधी सूचना पुढे ढकलणे नवे नसल्याचे प्रतित्तुर दिले.
अध्यक्षांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेसचे सदस्य अब्दुल सत्तार, सुनिल केदार यांच्यासह काही सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धरणे धरत त्या लक्षवेधीवर आताच चर्चा घेण्याची मागणी केली. तसेच विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनीही यासंदर्भात चर्चेची मागणी केली. अखेर सभागृहात उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात हस्तक्षेप करत यासंदर्भात सरकार चर्चा करण्यास तयार आहे. त्यामुळे या लक्षवेधीवर सविस्तर चर्चा होईल असे सांगत सभागृहाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
अध्यक्षांनीही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार यावर चर्चा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यास पुन्हा काँग्रेसच्या सदस्यांकडून आक्षेप घेत यापूर्वी अध्यक्षांनीच उत्तर न आल्याचे वक्तव्य केल्याची बाब अद्यक्ष बागडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अध्यक्ष बागडे हे निरूत्तुर झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा याप्रश्नी हस्तक्षेप करत हा प्रश्न कृषीबाबींशी संबधित असलेल्या गोष्टींत समावेश करून त्यावर चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अध्यक्ष विरूध्द विरोधक असा रंगलेला सामना निकाली निघाला.